कोल्हापूर, २५ जुलै, (हिं.स.) : गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण केली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून राधानगरी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे परिसरातील जनतेची चिंता वाढली आहे.
आजरा तालुक्यातील सर्व प्रकल्प तुडुंब भरले असून हिरण्यकेशी नदीला पूर आला आहे. या पावसामुळे भडगाव पुलासह सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गडहिंग्लज शहरासह नदीकाठच्या गावांमध्ये पाणी घुसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. पूरबाधित क्षेत्रातील लोकांनी आपले संसार आवरले. हिरण्यकेशीवरील गजरगाव बंधारा गुरुवारी सकाळी पाण्याखाली गेला, त्यामुळे दक्षिण-पूर्व भागासह चंदगड तालुक्यात जाणारी वाहतूक थांबली. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसामुळे हिरण्यकेशी आणि घटप्रभा नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.तीन दिवसांपूर्वी भडगाव पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
गजरगाव बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे ऐनापूर, जरळी, निलजी या प्रमुख मार्गांवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आधीच पाण्याखाली गेले आहेत. पूर्व भागाचा तालुका मुख्यालयाशी संपर्क पूर्णतः खंडित झाला आहे. पूरस्थितीमुळे नदीकाठच्या गावांजवळ पाण्याची पातळी वाढल्याने नागरिक धास्तावले आहेत.आजरा तालुक्यातील प्रकल्प तुडुंब भरल्याने थोड्याशा पावसातही हिरण्यकेशी नदीच्या पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरू शकते. प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि पाणी आलेल्या बंधार्यांवरून जाण्याचा प्रयत्न न करण्याचे आवाहन केले आहे. घटप्रभा नदीवरील कानडेवाडी बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे सांबरे परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.