संविधानाचे जनक, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहून देशाला एक नवी दिशा आणि मार्ग दाखवला. त्या महामानवाला काॅंग्रेसच्या तत्कालीन नेतृत्वाने केंद्रीय मंत्रीपद मिळू दिले नाही. उलट त्यांनी लिहिलेल्या संविधानाचा आपल्या सोयीनुसार बदल करून वापर केला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात रा.सु. गवई, प्रकाश आंबेडकर यांच्याप्रमाणे आंबेडकरी विचारांचे 9 मातब्बर नेते निवडून गेले. मात्र त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या सरकारमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा स्थान मिळाले आहे. आठवले हे एकमेव नेते आहेत, ज्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यात आपले विचार आणि व्यापक नेतृत्व पोहोचवत आहेत. यातून देशातच नव्हे, तर परदेशातही सवर्ण-दलित एकोपा निर्माण करत आहेत. या माध्यमातून एक सर्वसमावेशक, शिवशक्ती-भीमशक्तीचा झेंडा घेऊन राष्ट्रीय स्तरावरील एक आघाडीचा नेता म्हणून रामदास आठवले यांच्याकडे पाहिले जात आहे…
समस्त बहुजन समाज मोदींचा ॠणी
काॅंग्रेसच्या राजवटीत देशाचे अतोनात नुकसान झाले. कॉंग्रेसने पिढ्यानपिढ्या बहुजनांचे शोषण केले. त्यांचा केवळ आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला. मात्र त्यांना कधीच पुढे येऊ दिले नाही, त्यांना राजकारणात प्रगती करू दिली नाही. काॅंग्रेसने बाबासाहेबांचा अनेकदा अपमान केला. असेच शिर्डी मतदारसंघातून रामदास आठवलेंना पाडण्यासाठी पडद्यामागे अनेक षडयंत्रे केली. मात्र कॉंग्रेसने मागील काही दशकांत दाखवलेली मस्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरवत आहेत. त्यांच्याच कुशल नेतृत्वात देशात तिसर्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. राजकारणात विश्वासार्हता आणि उपयोगिता या दोन कसोटी आहेत. रामदास आठवले यांचे नेतृत्व या दोन्ही कसोटीवर पारखले गेले. त्यामुळेच रामदास आठवले यांच्यासारख्या बहुजन, रिपब्लिकन विचारांच्या नेत्याला तिसर्यांदा मंत्रिमंडळात स्थान देऊन यथोचित सन्मानच केला आहे, त्यासाठी रिपाइं आणि समस्त बहुजन समाज मोदींचा ॠणी आहे. आठवले यांनी मिळालेल्या मंत्रीपदाचा समाजासाठी उपयोग करून त्यांच्याकडे येणाऱ्या सर्व स्तरातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न नेहमीच केला.
विरोधकांचे खोटे नरेटीव्ह खोडून काढण्यात मोठा सहभाग
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात एनडीए विरुद्ध इंडी आघाडी, तर महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला होता. या राजकारणात पक्षांतराचे पेव मोठ्या प्रमाणावर फुटले होते. एखादा नेता सकाळी वेगळ्या पक्षासोबत, तर संध्याकाळी दुसऱ्याच पक्षासोबत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशा वेळी काॅंग्रेस आणि इंडी आघाडीतील सहकारी पक्षांकडून भाजप आणि मोदींविरोधात जोरदार प्रचार केला जात होता. यात भाजप, मोदी पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलतील, त्यामुळे लोकशाही धोक्यात येईल, अशी आवई उठवून काॅंग्रेसकडून भाजप आणि मोदी विरोधी नरेटीव्ह पसरवले जात होते. मात्र अशा परिस्थितीत देखील रामदास आठवले एनडीए, मोदींसोबत राहिले आणि देशभरात झालेल्या सभांमधून विरोधकांचा चुकीचा नरेटीव्ह खोडून काढण्यात महत्वाची भूमिका बजावली.
ईशान्य भारतात पोहोचवले आंबेडकरी विचार
स्वातंत्र्योत्तर काळात जिथे प्रस्थापित पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकले नाहीत, तिथे रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या सिक्कीम, दीव-दमण, अंदमान निकोबार, पाॅंडिचेरी आदी ठिकाणी शाखा आहेत. ईशान्य भारतातील राज्यांत आंबेडकरी विचारांचा एकही नेता गेल्या ७० वर्षांत भीमशक्तीचे विचार पोहोचवू शकला नव्हता. नागालॅंडसारख्या दुर्गम राज्यात रिपब्लिकन पक्षाचे स्वबळावर दोन आमदार निवडून आले आहेत. तेथील स्थानिक भाषा माहिती नसतानाही आठवले यांनी भीमशक्तीचे विचार रुजवले आणि आता नागालँड, मणिपूर या राज्यांत अनेक जण निळा झेंडा हातात घेऊन फिरत आहेत. विविध राज्यांतील विधानसभेत मिळालेल्या यशामुळेच रिपाइंला निवडणूक आयोगाकडून प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. हेच राष्ट्रीय स्तरावर रामदास आठवले यांच्या नेतृत्वाचा प्रभाव वाढत असल्याचे द्योतक आहे.
अन्य नेत्यांमध्ये व्यापक नेतृत्वाचा अभाव
बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र यशवंत उर्फ भय्यासाहेब आंबेडकर यांना राजकारणात फारसे यश आले नाही. भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षात गटबाजी केली. त्यात त्यांना आलेले अपयश, त्यामुळे झालेल्या बदनामीतून त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहुजनांचे राजकारण करायला सुरुवात केली. अशाच प्रकारे मायावतींचे नेतृत्व आले पण ते देखील अस्त पावले. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राजकारणात आला. मात्र त्याचे वेगळेच राजकारण सुरू आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर, मायावती, पासवान हे देखील राष्ट्रीय पटलावर मर्यादित राहिले आणि राष्ट्रीय नेते होऊ शकले नाहीत. त्या तुलनेत रामदास आठवले व्यापक नेतृत्व बनून बहुजन समाजाला पुढे घेऊन जात आहेत.
बाबासाहेबांच्या स्मारकासाठी काॅंग्रेसने फसवले
बाबासाहेबांचे एक भव्य दिव्य असे स्मारक व्हावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून समस्त आंबेडकरप्रेमींची मागणी राहिली आहे. त्यासाठी मुंबईत (महाराष्ट्र) चैत्यभूमी नजीक लाखो आंबेडकरप्रेमी दरवर्षी नतमस्तक होण्यासाठी येतात. त्याच ठिकाणी इंदू मिल परिसरात हे स्मारक उभे राहावे, असा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातही प्रयत्न झाले. मात्र त्यावेळच्या केंद्र-राज्य सरकारांनी किंवा काॅंग्रेस नेत्यांनी ते होण्यासाठी म्हणावा तसा पुढाकार घेतला नाही. अर्थात काॅंग्रेस आघाडीतील युपीए सरकारने फसवले. मात्र मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आले आणि त्यांनी इंदू मिलची १२.५ एकर जमीन यासाठी देऊ केली आणि आता त्या ठिकाणी स्मारकाचे काम सुरू आहे.
अशा प्रकारे राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपण्याचे काम रामदास आठवले करत आहेत. त्यामुळे आज दिल्लीत त्यांच्याभोवती सर्व जाती-धर्माचे लोक जोडले जात आहेत. ते अजातशत्रू नेते आहेत. त्यांच्या या स्वभावामुळेच ते केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश स्तरावरील सर्व जाती, धर्म, भाषा, प्रांत या भेदाच्या पलीकडे गेलेले आणि प्रत्येकाला आपलेसे वाटणारे राष्ट्रीय नेते आहेत.
(रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांच्याशी झालेल्या चर्चेचे सार)