मालगुंड येथे प्राणिसंग्रहालय झाल्यानंतर पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. परिणामी, येथील परिसराचा विकास होईल. येथे कोणीही बेरोजगार राहणार नाही. नागरिकांच्या संपूर्ण शंकांचे निरसन करूनच हा प्रकल्प करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या विशेष निधीतून मालगुंड येथे प्राणिसंग्रहालयाची सुरक्षा भिंत बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते काल (दि. १३ मार्च) झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात प्राणिसंग्रहालय व्हावे, ही दहा वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होत असल्याने आनंद होत आहे. यासाठी मी मंत्री असलेल्या विभागाच्या माध्यमातून प्राणिसंग्रहालयासाठी ७४ कोटीचा निधी मंजूर असून, सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून आठ कोटीचा निधी सुरक्षा भिंत बांधण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. आरे वारे, गणपतीपुळे, मल्टीमीडिया शोबरोबरच प्राणिसंग्रहालय झाल्याने येथे पर्यटकांमध्ये वाढ होईल. संपूर्ण वर्षभर नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. येथील भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास होईल.
या प्राणिसंग्रहालयासाठी माफक दरामध्ये जमीन दिलेल्या जमीनमालकांचे पालकमंत्री सामंत यांनी यावेळी आभार मानले.यावेळी सिंधुरत्न समृद्धी योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, विभागीय वन अधिकारी दीपक खाडे आदी उपस्थित होते.वन्यप्राणी व्यवस्थापन योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून घेण्यात आलेल्या दोन बोलेरो पिकअप वाहनांचे वितरण पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते विभागीय वन अधिकारी श्री. खाडे यांना करण्यात आले.