तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे- 18 जुलै अंबड तालुक्यातील डोमेगाव हे पावसाअभावी टॅंकर भरोसे असले तरी सौ. सविता बाबासाहेब शेळके यांनी गावातील घनवन प्रकल्प हा बोअरवेलच्या पाण्यावर हिरवागार केला आहे. दागिने गहाण ठेवून व कर्ज काढून डोमेगावात स्वखर्चाने २२५शौचालये बांधून लक्ष वेधून घेतलेल्या सविता बाबासाहेब शेळके यांनी डोमेगावात दारुबंदीसाठीही पुढाकार घेतला होता. गतवर्षी जालना जिल्ह्यात दुष्काळ पडला होता.
जिल्ह्यातील अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. डोमेगाव ग्रामपंचायतीमध्ये पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून सेवेत असलेले बाबासाहेब शेळके यांनी गावात जल जीवन मिशन अंतर्गत घेतलेल्या बोरवेलवर स्वखर्चाने दोन विद्युत पंप बसवून वाढीव बोरवेल घेऊन डोमेगावची तहान भागविली होती. यंदा पाऊस कमी झाल्याने डोमेगावही टँकरभरोसे झाले आहे.गावाला टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
गावातील पाणीटंचाई निर्मूलनासाठी पुढाकार घेणारे शेळके दाम्पत्य पर्यावरणीय कार्यातही अग्रेसर आहेत. डोमेगावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून सविता शेळके यांनी सुरू केलेला घनवन प्रकल्प दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या काळातही हिरवागार ठेवला आहे. गाव टँकरभरोसे झाल्यानंतर बोअरवेलच्या पाण्यावर सविता शेळके यांनी घनवन हिरवागार ठेवला आहे. घनवन प्रकल्पातील झाडे दुष्काळी वातावरणातही हिरवीगार आहेत. झाडी वाचली पाहिजेत, पर्यावरणीय समतोल राखला गेला पाहिजे, या विचाराने सविता शेळके यांनी झाडे जगविण्यासाठी धडपड सुरू ठेवली आहे.शेळके दाम्पत्य घनवन प्रकल्पातील झाडांना पाणी देवून त्यावर किटकनाशक फवारणी करीत असून डोमेगाव येथील हा घनवन प्रकल्प चांगलाच बहरला आहे.