जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील १६५ शाळांमध्ये यंदाच्या वर्षापासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत त्यामुळे इयत्ता पहिलीमधील ३३७८ विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक नुकतीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी शिक्षण विभागातील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात १७५ शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती. त्यानुसार यावेळी जिल्ह्यातील १६५ शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच त्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून पुस्तके व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचेही ठरले. गुढीपाडवा पट वाढवा या उपक्रमांतर्गत शाळांची पटसंख्या १० टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट होते. सद्यस्थितीमध्ये इयत्ता पहिलीचे ७० नोंदणी झालेली आहे. उर्वरित पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी केली.
शेळगी येथील सावित्रीबाई फुले मुलीचे वसतिगृहामधील विद्यार्थीनीसाठी भौतिक सुविधा व सुधारणा करण्याबाबत सुचना करण्यात आली. शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये शाळा पूर्व तयारी शाळेस सर्व सुविधा व स्वच्छतेबाबत खात्री करण्यासाठी पर्यवेक्षीय यंत्रणेनी शाळा सुरू होण्यापूर्वी भेटी देऊन अहवाल सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत सर्व शाळांमध्ये परसबाग तयार करणे याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतील अमृतरसोई योजना जास्तीत जास्त शाळांमध्ये अंमलबजावणी करणे, आदी निर्णयही घेण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (योजना) सुलभा वठारे , उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्यासह सर्व गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी उपस्थित होते.