हिंगोली, ५ ऑगस्ट (हिं.स.) : मनोज जरांगे यांनी वंचितांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करत, गरीब, दलित, मुस्लिम, आणि बारा बलुतेदार समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना उद्देशून म्हटले की, “गरीबांच्या नेत्यांनी एक राहिले पाहिजे, जे वंचितांसाठी काम करतात.” जरांगे यांनी गरिबांना सत्तेत जाण्याची संधी मिळवण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी आंबेडकरांना सजगतेने वंचित समाजाच्या भावना समजून घेण्याचे आवाहन केले आणि “सर्व राजकारण्यांना पायाखाली तुडवण्याची हीच वेळ आहे,” असे सांगितले.
राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत मांडलेल्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी ठाकरे यांना “गोरगरीब लोकांच्या जीवाशी खेळणारे” असे संबोधून त्यांची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात चालवलेल्या अभियानाचा भाग असल्याचे म्हटले. जरांगे यांनी स्पष्ट केले की, “श्रीमंत राजकारण्यांना गरीब मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न नाही कळणार.” ते म्हणाले की, हे राजकारणी पैशांच्या गादीवर झोपणारे आहेत आणि त्यांना गरीबांच्या वेदना समजणार नाहीत. त्यांनी मराठा समाजाला आवाहन केले की त्यांनी राजकारणी नेत्यांच्या खोट्या आश्वासनांना बळी न पडता, त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू ठेवावा.राज ठाकरे यांच्या “महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही”
या वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी धाराशिवमध्ये त्यांच्या हॉटेलवर जाऊन जाब विचारला. यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मराठ्यांनी ध्यान द्यायचे नाही. हे नेते केवळ डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.” त्यांनी मराठा आंदोलकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आणि राजकीय नेत्यांच्या मुद्द्यांवरून विचलित न होण्याचे आवाहन केले. जरांगे यांनी मराठा समाजाला पुढील निवडणुकीत लढण्यासाठी सज्ज राहण्याचे सांगितले.प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी बोलताना जरांगे म्हणाले की, “आम्ही त्यांचा आदर करतो. मी सामन्यांच्या भावना सांगतो, आणि त्या भावनांकडे त्यांनी लक्ष द्यावे.” त्यांनी आंबेडकरांना जनतेच्या भावना गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची विनंती केली.