भाईंदर, ११ जुलै, (हिंस): भाईंदर रेल्वे स्थानकावर पित्रा-पुत्राच्या आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समाजमन सुन्न झाले. हरीश मेहता आणि जय मेहता यांनी शेअर मार्केटमधील मोठ्या नुकसानीमुळे आत्महत्या केल्याचे बोलले जात होते, परंतु हरीश मेहता यांच्या सुनेच्या दाव्यामुळे प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
हरीश मेहता आणि जय मेहता यांनी भाईंदर रेल्वे स्थानकातून नायगावच्या दिशेने लोकलखाली आत्महत्या केली. वसई रेल्वे पोलिसांनी मृतदेहांची ओळख पटवल्यानंतर नातलगांनी त्यांना ताब्यात घेतले. मेहता कुटुंबाच्या घरातून पोलिसांना इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी सापडली, ज्यात “आम्ही जबाबदार आहोत” असे लिहिले होते.
मात्र, पोलिसांच्या तपासात कर्जाचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.जय मेहता यांच्या पत्नीने देखील कर्ज नसल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी हरीश आणि जय यांच्या मोबाइलची तपासणी सुरू केली आहे, पण आत्महत्येचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. वरिष्ठ निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले की, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना समजून घेण्यासाठी आणि सत्य शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे, आणि या घटनेमुळे समाजात विविध चर्चांना उधाण आले आहे.