अभिनेते किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला, यानंतर त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.
‘मुलगी झाली हो’, ‘बिग बॉस मराठी ४’ फेम अभिनेते किरण माने सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ७ जानेवारी रोजी त्यांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधलं. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटातील इतर नेतेमंडळींच्या उपस्थितीत किरण यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी असे म्हटले की कोणत्याही राजकीय हेतूने त्यांनी पक्षप्रवेश केलेला नाही. दरम्यान शिवबंधन बांधल्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्टही शेअर केली. शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, मातोश्रीवरील अनुभव आणि प्रवेशामागील कारणं सांगणारी ही पोस्ट आहे.
वाचा किरण माने यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
“”…किरणजी, तुमचे लेख मी वाचलेत. फार छान लिहीता. उद्धवजी येतील थोड्या वेळात, तुम्ही आधी नाष्टा-चहा करून घ्या. रिलॅक्स व्हा. हे तुमचंच घर आहे.” रश्मी वहिनींनी स्वागतच असं केलं की, ‘मातोश्री’ विषयी मी काॅलेज जीवनापास्नं ऐकलेल्या अनेक गोष्टी झरझरझरझर डोळ्यांसमोरून जाऊ लागल्या. अमिताभ बच्चनपासून दादा कोंडके, नाना पाटेकरांपर्यंत अनेकांनी मीनाताई ठाकरेंच्या आदरातिथ्याबद्दल भरभरुन सांगितलेल्या अनेक गोष्टी माझ्या मेंदूत कोरलेल्या आहेत. अगदी तसंच आदरातिथ्य रश्मी वहिनी करत होत्या. आम्ही भरभरुन गप्पा मारल्या. मी विचार करत होतो, गेल्या दोन तीन वर्षांत हे कुटूंब अनेक जीवघेण्या आघातांमधनं गेलंय. जवळच्यांनी, रोज या घरात वावरणाऱ्यांनी केलेले ते घाव अजूनही ओले आहेत. वेदना होत असणार. तरीही या माऊलीच्या चेहऱ्यावरचं हास्य जराही मावळलेलं नाही. सगळं दु:ख पचवून चेहरा प्रसन्न ठेवायला जिगरा लागतो. माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं.
.
गेली चार दशकं ‘मातोश्री’ या वास्तूचं आकर्षण अख्ख्या महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला ‘मातोश्री’ हा अजिंक्यतारा आहे, हे विरोधकही नाकारणार नाहीत! मुंबईत भले कितीही उंच टाॅवर्स उभे राहोत, ‘मातोश्री’पुढे सगळं खुजं आहे. मला बहिणीसारख्या असलेल्या सुषमा अंधारेताईंनी ‘मातोश्री’वर बोलावले तेव्हापासून काळीज धडधडायला लागलं होतं! सुषमाताई म्हणजे मायेची सावली. दोन वर्षांपूर्वी माझ्यावर जो मोठा आघात झाला होता, तेव्हा ओळख नसतानाही स्वत:हून फोन करुन भेटून, मला न्याय मिळावा म्हणून माझ्यासाठी जीवाचं रान केलेले जे दोनचार लोक होते, त्यांपैकी एक सुषमाताई. त्याविषयी सविस्तर लिहीन नंतर. पण त्या सोबत असल्यामुळे एक दिलासा होता.
उद्धवजी आले. सोफ्यात बसले. मनात आलं, इथेच कधीकाळी बाळासाहेब ठाकरे बसत असतील! ‘कधी आलात किरणजी?’ उद्धवजींच्या प्रश्नानं भानावर आलो. चर्चा सुरू झाली. मी मुद्दाम ठरवून प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारधारेचा विषय काढला. त्यावर उद्धवजी इतके सविस्तर बोलले की मी अवाक झालो. त्यांच्या विचारांचा सगळा अर्क उद्धवजींच्या नसानसात आहे, हे जाणवलं. प्रबोधनकारांची शाहू महाराज आणि डाॅ. आंबेडकरांसोबतची एक दादरच्या गणेशोत्सवातली आठवण जेव्हा उद्धवजींनी सांगितली. तेव्हा मनाशी म्हटलं, ये वजह है के ये बंदा अभी भी डटकर खडा है! काही वेळा राजकारणात काही गोष्टींत तडजोडी कराव्या लागतात. त्या पूर्वी त्यांनी केल्याही असतील, पण आता संविधान पोखरून समोर जो विषमतेचा, अन्यायाचा, अराजकाचा दहशतीचा अक्राळविक्राळ राक्षस उभा राहिला आहे, त्याची पुरेपुर जाणीव असलेले देशात जे आठदहा नेते उरले आहेत, त्यातले एक उद्धवजी ठाकरे आहेत, हे नक्की!
बास. आणखी काय पायजे? आता एक होऊन लढायचं. बाकी बारीकसारीक मतभेद सगळीकडेच रहाणार. शत्रू फिक्स झाला ना? विषय कट. बाकी सविस्तर बोलत राहीन. पण फिकीर करू नका भावांनो, ह्यो सातारी वाघ मागं हटनार नाय. आपली विचारधारा ह्यो आपला ‘नाद’ हाय. त्यो कुटं जात न्हाय. शिवसेना आपलीशी केलीय. आता उतनार नाय, मातनार नाय, घेतला वसा टाकनार नाय. जय शिवराय! जय भीम! जय महाराष्ट्र! – किरण माने.”
ही पोस्ट करताना माने यांनी ‘मातोश्री’वर असणाऱ्या बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या एका फोटोफ्रेमसोबतचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.