मंठा शहरातील हा एकमेव रस्ता लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्षित…… मंठा/ प्रतिनिधी : मंठा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मारोती मंदिरापासून गावात जाणारा मुख्य रहदारीचा एकमेव रस्ता लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्यामुळे अद्यापही दुर्लक्षित आहे. गावातील मानाची पालखी, गणपती मिरवणूक असो, महावीर जयंती, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक करणारी वाहने, बैलगाड्या असो किंवा गावातून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रेचा हा मुख्य मार्ग आहे.
बागवान गल्ली, मारवाडी गल्ली, बालाजी गल्ली, बोराडे गल्ली, ब्राह्मण गल्ली तसेच श्री विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या या रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. या रस्त्यालगत असलेल्या मरकस मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांचे अनेक लग्न समारंभ होतात तसेच श्री लक्ष्मीनारायण मंदिरापासून दररोज सकाळी निघणारी प्रभात फेरी सुद्धा या रस्त्याने जाते. हा रस्ता अरुंद तर आहेच शिवाय पावसाळ्यात या रस्त्याने चालणे कठीण होऊन जाते.
गावातील वेस अथवा गावातील भाजी मंडी म्हणून सर्वांना या रस्त्याचा वापर करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून चिंचने यांच्या घरापर्यंत नालीसह रस्ता करणे गरजेचे आहे. यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी या रस्त्याचे भूमिपूजन केले होते, भूमिपूजनाचा फलकही मारोती मंदिराजवळ लावण्यात आला होता. नंतर फलक गायब झाला आणि रस्त्याचे काम रखडले. या दुर्लक्षित रस्त्याचे भाग्य कोण उजळविणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे…………………….
चौकट १)… लोकप्रतिनिधींना या रस्त्याची ऍलर्जी – कबीर तांबोळी… गेल्या अनेक वर्षापासून मंठा गावात जाणारा हा एकमेव रस्ता लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित आहे. लोकप्रतिनिधींना या रस्त्याची ऍलर्जी का ? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते कबीर तांबोळी यांनी केला. या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.