अमरावती 29 जुलै (हिं.स.) : येथील अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून येत्या २४ तासात अप्पर वर्धा धरणाची दरवाजे केंव्हाही उघडू शकतात.
त्यामुळे नदी काठच्या गावांना तसेच मासेमाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत पत् अप्पर वर्धा धरण विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर यांना रवाना करण्यात आले आहे. अप्पर वर्धा धरणाची जलपातळी अद्यापही पूर्ण झाली नसली तरी जुलैच्या अखेरीस ७४ टक्केच्या खाली धरण भरल्यास अप्पर वर्धा धरणाची दरवाजे उघडण्याची वेळ येऊ शकते.
अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठे धरण असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून सतत पाऊस कोसळत असल्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात दररोज वाढ होत आहे. अप्पर वर्धा धरणाची निर्धारित पाण्याची पातळी ३४२.५० मिलिमीटर एवढी ठेवण्यात आली असून सध्या ही पातळी ३४० मिलिमीटर झाली आहे.
त्यामुळे जवळपास ६५:५२ टक्के धरण भरलेले आहे. मध्यप्रदेशातून वाहत येणाऱ्या जामनदी व माडू नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यास तसेच अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी कोसळल्यास धरणाच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ होऊ शकते व अप्पर वर्धा धरणाची दरवाजे २४ तासात केंव्हाही उघडू शकते, असे अप्पर वर्धा धरण विभागाच्या उपविभागीय अभियंता मनाली नंदागवळी यांनी सांगितले.