राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर
मुंबई, 8 जुलै (हिं.स.) : मुंबईतील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे रूग्ण, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांना हाल सोसावे लागले. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात येत आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येईल असे महानगरपालिका प्रशासनाने कळवले आहे. संपूर्ण महाराष्ट्राभर पावसाने धुमाकूळ घातला असून आज आणि उद्याही पावसाचा जोर कायम रहाणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहेे.
गेल्या काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तसेच, पुढचे तीन ते चार तास मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गेल्या काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचले. त्यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या.
पावसाचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झाला आहे. ठिकाणी लोकल सेवा धिम्या गतीने सुरू आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.जोरदार पावसामुळे आज मध्य रेल्वेवरील कर्जत-खोपोली, कसारा येथून सीएसएमटी लोकल कल्याणपर्यंतच धावत असून ती पुढे रद्द करण्यात आली आहे.भांडुप स्थानकावरील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. तर कुर्ला-मानखुर्द स्थानकात रेल्वे रुळावर पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.वडाळ्यात पाणी साचल्यामुळे गोरेगाव-सीएसएमटी लोकल पुढील सूचना मिळेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
पुढील ३-४ तास मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ३ तासानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मागील २४ तासांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ८ जुलै ते १० जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमधे गेल्या सहा तासांत मुसळधार पावसाची विक्रमी नोंद झाली आहे.रात्री १ ते सकाळी सातपर्यंत अनेक ठिकाणी ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कसारा ते टिटवाळा स्थानकांदरम्यान रुळांवर झाड पडल्यामुळे लोकल सेवा ठप्प आहे. कल्याण ते कसारा दरम्यान ट्रॅकवर डोंगराची माती पडून ओएचईला आधार देणारा खांब वाकल्याची घटना घडली. पनवेल-कळंबोली परिसरात ट्रॅक पाण्याखाली गेला.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्घ जिल्ह्यात जोरदार पाऊस
जगबुडीने धोक्याची पातळी ,ओलांडली असून खेड, चिपळूण, महाड, दापोली या चार तालुक्यात पुरस्थिती गंभीर आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात आज रेड अलर्ट जारी केला असून या भागात अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.कोकणात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मुसळधार पाऊस, नदी-नाले तुडूंब वाहत आहेत. पुन्हा एकदा खेड, चिपळूण, महाड ही तीन शहरे पुराच्या उंबरठ्यावर आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे.तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तर सांगलीतही कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.राज्यातील ग्रामीण भागातील एसटी वाहतूकही कोलमडली आहे. यामुळे कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची देखील मोठी अडचण झाली आहे.