वाळूज महानगर (प्रतिनिधी) झेप प्रकाशनच्या वतीने वाड्:मयीन संस्कृती दृढ व्हावी या हेतूने दरवर्षी कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झेप राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजिण्यात येते. या वर्षी हे संमेलन सप्टेंबर मध्ये होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी झेप पुरस्कार निवड समिती अध्यक्षा श्रीमती ए .बी .साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सल्लागार संपादक डॉ .ऋषीकेश कांबळे, कार्यकारी संपादक प्रा. शिवाजी वाठोरे यांनी सुचवलेल्या नावानुसार झेप साहित्य संमेलन अध्यक्षपदी थोर साहित्यिक डॉ. बी. जी. गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली.
तसे पत्र अनागरिक धम्मपाल संघाचे अध्यक्ष मुकुंद दादा सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अशी माहिती झेप साहित्य संमेलनाचे संयोजक डी. एन. जाधव यांनी दिली. डॉ. बी. जी .गायकवाड यांचे अश्रूगंध,कॉलेजच्या कविता, भाषण शिका व जग जिंका आदी ग्रंथ प्रकाशित असून अनेक ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या कवितेचा अनेक भाषेत अनुवाद झाला आहे. विविध साहित्य संमेलनात त्यांनी कविता वाचन केले आहे.