एकविसाव्या शतकातील हा काळ जगाला नवी दिशा दाखवणारा आणि नवी दिशा देणारा महत्त्वाचा काळ असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारताच्या यजमानपदात आयोजित जी-20 शिखर परिषदेच्या बैठकीला आज, शनिवारपासून नवी दिल्ली येथे सुरुवात झाली. या बैठकीत सहभागी झालेल्या जगभरातील नेत्यांचे स्वागत करताना ते बोलत होते.
याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा असा काळ आहे जेव्हा अनेक वर्षांच्या अडचणी आता नव्या उपाययोजनांची मागणी करत आहेत. म्हणून आपल्याला मानवकेंद्री दृष्टीने पाऊल उचलत जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील आणि पुढे जावे लागेल. जागतिक अर्थव्यवस्थेतील चढउतार असो, उत्तर आणि दक्षिणमधील विभागणी असो, पूर्व आणि पश्चिममधील दुरावा असो, अन्न, इंधन आणि खते यांचे व्यवस्थापन असो, दहशतवाद आणि सायबर सुरक्षा असो, आरोग्य, उर्जा आणि पाणी सुरक्षा असो, वर्तमानासह भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्याला या आव्हानांवर उपाययोजना करण्याकडे वाटचाल करावी लागणार आहे.
भारताचे जी-20 परिषदेचे अध्यक्षपद देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर समावेशकता आणि सर्वांना सोबत घेण्याचं प्रतिक झाले आहे. देशातील 60 शहरांमध्ये दोनशेहून अधिक बैठका झाल्या. भारतात जी-20 जनतेची परिषद झाली आहे. कोट्यावधी भारतीय या परिषदेबरोबर जोडले गेले आहेत. सर्वांना सोबत घेण्याच्या भावनेनेच भारताने अफ्रीकन संघाला जी-20 चे स्थायी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मला विश्वास आहे की, या प्रस्तावावर आपल्या सर्वांचं एकमत होईल असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले.