नव्या मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडे यांच्याकडे कृषिखात्याचा पदभार आला आहे. खातेवाटप झाले अन् अधिवेशन सुरू झाले. दुसरीकडे, मराठवाड्यातील अनेक भागात सोयाबीन आणि कपाशीवर गोगलगायींनी हल्ला चढवला आहे. कृषिमंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथमच बीडच्या दौऱ्यावर आलेल्या मुंडे यांनी गोगलगायींमुळे प्रादुर्भाव झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी शेवार गाठले. शेतकऱ्यांच्या बांधावरून त्यांन कृषी सचिवांना फोन लावत नुकसानभरपाईबाबत चर्चा केली.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ तालुक्यातील बेलंबा, वाघबेट शिवारातील गोगलगायींनी बाधित झालेल्या सोयाबीन, कपाशी आदी पिकांची पाहणी केली. गोगलगायींमुळे होत असलेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे केले जावेत, याबाबत संबंधितांना आदेश दिले आहेत. त्याचबरोबर गोगलगायींना नष्ट करण्यास उपयुक्त असणारी औषधे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कृषी विभागास उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना दिली आहे.
मुंडे यांनी शेतातून थेट सचिवांना फोन लावला. ते म्हणाले की, माझ्या परळी मतदारसंघातील काही भागात सोयाबीन आणि कपाशी पिकाचे क्षेत्र गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात बाधीत झाले आहे. माझ्यासोबत बीडच्या जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी आहेत. मला तुमचा एक आदेश लागेल. एकतर या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. किमान पावसामुळे काही ठिकाणी पेरलेलं उगवलंच नाही. पाऊस पडतच नाही. गोगलगायींच्या संदर्भात मागे नांदेड व इतर परिसरासाठी आदेश काढला होता. तसा तो बीडलाही काढला तर आपल्याला या अधिवेशनाच्या काळात शेतकऱ्यांना काहीतरी मदत जाहीर करता येईल.