बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने मान्सूनची प्रतीक्षा संपणार आहे. लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये दाखल झालेला पाऊस हळूहळू पुढे सरकत आहे. महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा लागली असून ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पश्चिमी किनारपट्टी भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. बिपरजॉयने चक्रीवादळाने मार्ग बदलला आहे. गेल्या 12 तासांमध्ये चक्रीवादळ हळूहळू उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकत आहे. चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकण्याची शक्यता याआधी हवामान खात्याने वर्तवली होती. त्याआधी 13 जून दरम्यान महाराष्ट्रात तर 16 जूनपर्यंत मुंबईत मान्सून दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, आता चक्रीवादळामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितलं आहे की, चक्रीवादळाच्या सावटाखालीही केरळ, कर्नाटक, गोवा आणि तळकोकणातील किनारपट्टीच्या भागात ढगांची दाटी होताना दिसत आहे. ही परिस्थिती मान्सूनसाठी अनुकुल होत आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलला असून हे उत्तर-ईशान्य दिशेने पुढे जात आहे. ‘बिपरजॉय’ तौक्ते चक्रीवादळानंतरचं सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे. गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी 175 किलोमीटरहून अधिक आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी दुपारी मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) ओलांडण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ तौक्तेनंतरच सर्वात शक्तिशाली वादळ असल्याचं बोललं जात आहे. जेव्हा चक्रीवादळ धडकणार तेव्हा वाऱ्यांचा ताशी वेग 125 ते 135 किलोमीटरपर्यंत राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. भारताच्या किनारपट्टीवर बिपरजॉय धडकण्याची शक्यता नाही. बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानमध्ये धडकण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.