छत्रपती संभाजी नगर मधील कालची घटना ही शहराच्या औद्योगिक विकासाच्या परिघातून बघणे अत्यंत गरजेची अशी आहे . काल छत्रपती संभाजी नगर मध्ये काही दंगलखोरांनी थैमान घातला . शहरातील किराडपुरा परिसरात ही घटना घडली . हा परिसर संमिश्र अशा वस्तींचा परिसर आहे . परिसरात प्रभू श्री रामाचे जुने मंदिर आहे प्रतिवर्षी श्री राम नवमीच्या निमित्याने इथे मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र येतात . या मंदिरातील आरतीनेच शहरातील रामनवमी च्या कार्यक्रमाला खऱ्याअर्थाने सुरुवात होते . काल रात्री काही भाविक तिथे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जमा झाले होते . काही दंगलखोरांनी रात्री साडे अकराच्या सुमारास तिथे धुडगूस घातला .
दगडफेक आणि मग जाळपोळीला सुरुवात केली या जाळ पोळी मध्ये पोलिसांचे वाहनही बळी पडले . पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश जरी आले असले तरी ही घटना बहुआयामी मानसिकता आणि त्यामागील वास्तविकता विशद करणारी आहे . प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रावर परिणाम करणारी आहे . ही बाब आता लक्षात घेणं जरुरी आहे .गेल्या एक महिन्यापासून शहराचे वातावरण अशांत आहे . यांची दखल घेत शहरातील औद्योगिक संघटनांनी एक पत्रकार परिषद काही दिवसांपूर्वी घेतली होती . शहरातील या अशांत वातावरणाचा दुष्परिणाम उद्योगांवर होऊ शकतो अशी शक्यता त्या पत्रकार परिषदेत उद्योजकांनी व्यक्त केली होती . विशेषतः करून जी – 20 च्या यशस्वी सादरीकरणानंतर शहरातील उद्योजकां मध्ये एक उत्साहाच , एक आशावादाचं एक आनंदाचं , एक अनुकूलतेच वातावरणनिर्माण झालं होतं मात्र काल च्या घटनेमुळे पुन्हा निराशाचे ढग दाटून आले आहेत की काय अशी शंका निर्माण होत आहे . उद्योजकांनी आयोजित पत्रकार परिषदेत याच दुष्परिणामा कडे लक्ष वेधले होते .
शहरात निर्माण होत चाललेली अशांत परिस्थिती ही जी – २० मुळे निर्माण झालेल्या अनुकूलतेवर दुष्परिणाम करणारी ठरू शकते अशी दाट शक्यता त्या पत्रकार परिषदेमध्ये उद्योजकांनी व्यक्त केली होती कालच्या घटनेमुळे ती शक्यता अधिक दाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही . कारण कोणताही बडा उद्योजक आपला उद्योग शहरात सुरू करण्यापूर्वी शहराच्या एकुण परिस्थितीचा आढावा घेतल्याशिवाय राहात नाही आणि तो आढावा घेताना हे अशांततेचे शहरातील चित्र त्यांच्या नजरेतून सुटणार नाही . आणि शहरात मोठे उद्योग येण्याची शक्यता कमी कमी होत जाणार आहे . गेल्या काही वर्षापासून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने शहरात ऑरिक सारखा बहुउपयोगी असा प्रकल्प उभारला जात आहे जो शहराच्या विकासाला सहाय्यभूत ठरणारा आहे शहरातील उद्योजकांना चालना देणारा आहे शहराकडे पाठ फिरवणाऱ्या बड्या उद्योजकांना आकर्षित करणारा आहे आणि अशा सर्व सकारात्मक बाबीत जी 20 चे सादरीकरण ही जमेचीबाजू आहे . असे सगळे उद्योगाला चालना देणारे योग जुळून येत असताना अशा दंगली या सगळ्यावर दुष्परिणाम करणाऱ्या ठरण्याची दाट शक्यताआहे . हीच भीती आज उद्योग जगतामध्ये निर्माण झाली आहे कोणत्याही शहराची आर्थिकचक्र हे उद्योजकांच्या प्रगतीवर अवलंबून असतात . हे साधं गणित आहे मात्र अश्या अशांत वातावरणामुळे औद्योगिक विकासाला गतिरोधक ठरणार आहे . ऐकीकडे केंद्र आणि राज्य सरकार शहराला औद्योगिक गतवैभव मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे अश्या घटना केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नावर पाणी फिरवत आहे . ८० च्या दशकात शहरातील उद्योग चक्र गतिमान होते .
या औद्योगिक विकासामुळे शहराची प्रगती होत होती . शहर झपाट्याने वाढत होत . मात्र आज शहरात निर्माण झालेली अस्थिरता औद्योगिक प्रगतीला बाधक ठरणारी आहे . मराठवाड्याची कृषी परिस्थिती सर्वश्रुत अशी आहे कधी दुष्काळाचा सामना मराठवाड्यातील शेतकऱ्यांना करावा लागतो तर कधी अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक हातातून जात . अशा प्रतिकूल कुटुंबातील अनेक युवक रोजगारासाठी शहराकडे धाव घेतात पण शहरातील अशी अशांत व अस्थिर परिस्थिती उद्योजकाला कशी चालना देणार आणि अश्या बेरोजगार युवकांना कशी रोजगार मिळवून देणार हीच चिंता आज निर्माण झाली आहे . युवकांना रोजगार मिळाला नाहीतर बेरोजगारीच्या दुष्टचक्र निर्माण व्हायला वेळ लागणार नाही मग या दुष्टचक्राला कोण जबाबदार ? हा प्रश्न अंर्तमुख करणारा आहे . शहराची आजची औद्योगिक परिस्थिती पाहता शहरातील बडे उद्योजक शहरातून जाण्याच्या मानसिकते मध्ये आहेत .
अश्या अस्थिर वातावरणामुळे ती मानसिकता अधिक प्रबळ होण्याची शक्यता अधिक आहे . असे न घडो पण एक शक्यता जर असे घडले आणि शहरातील बडे उद्योजक शहरातून गेले तर शहरातील लघु उद्योजक आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगारावर मोठा दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शहरातील शांतेच , सलोख्याचे वातावरण किती गरजेचे आहे हे वेगळे सांगणे नको . शहरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी सामुदायिक प्रयत्नाची गरज आहे . असे सामुहिक प्रयत्नांना जर यश आले तर शहराला औद्योगिक गतवैभव प्राप्त होईल .
1980 च्या दशकात शहर औद्योगिक प्रगतीपथावर होत . त्यामुळे शहराचा विकास झपाट्याने झाला होता . तोच विकास केंद्र आणि राज्य सरकारला अपेक्षित आहे किंबहुना त्यापेक्षा अधिक विकासाचे ध्येय सरकारने निश्चित केले आहे . मात्र कालच्या घटना शहराच्या प्रतिमेला आणि प्रगतीला बाधक ठरत आहे . अश्या घटनाची पुनरावृत्ती होणार नाही ही मात्र सार्वत्रिक जवाबदारी आहे . ती नाकारून चालणार नाही . शहराच्या प्रगतीसाठी हे गरजेचे आहे.






















