माहूर – महाराष्ट्र राज्याचे सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, मुंबई यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. द्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पात्र लाभार्थ्यांना एका लाखाचे अनुदान वाटप करण्यात आले.
शासन निर्णय क्रमांक : राकुला-2012/प्र.क्र.277/विसयो-2, मंत्रालय मुंबई, दि. 21 नोव्हेंबर 2013 अन्वये दारिद्रय रेषेखाली नोंद असलेल्या कुटूंबातील 18 ते 59 वयोगटातील कोणतीही कमावती व्यक्ती मृत्यू पावल्यास त्यांच्या कुटूंबियास राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत लाभ देण्यात येतो.
त्यानुषंगाने माहूर तहसिल कार्यालयात प्राप्त झालेल्या अर्जानुसार 05 पात्र लाभार्थी चंद्रकला राजू नल्लावार रा. गोंडवडसा, मुकिंदा दाऊ कानिंदे रा. पडसा, संगीता मारोती पवार रा. इवळेश्वर, गणपत भिमा मडावी रा. म.पार्डी, हसीनाबी शे. मेहबूब रा. माहूर प्रत्येकी रु. 20000/- याप्रमाणे रु. 1,00,000/- चे अनुदान पी एफ एम एस प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत जगपात यांनी दिली आहे. तसेच माहूर तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी योग्य त्या कागदपत्राची पुर्तता करुन राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.
याकामी संगांयो विभागाचे नायब तहसीलदार श्रीमती. अरुणा सुर्यवंशी, महसूल सहायक वैभव पांढरे, आय. टी. असिस्टंट उदय वानखेडे यांनी परिश्रम घेतले.

























