सोलापूर – स्वराज्य उभं राहत असताना रणांगणाइतकंच महत्त्वाचं असलेलं, पण इतिहासाच्या पानांमध्ये क्वचितच नोंद झालेलं एक मौनातील सामर्थ्य म्हणजे बहिर्जी नाईक. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यसंकल्पनेत पूर्णपणे मिसळलेला, विचार, योजना आणि धाडस यांचा अद्भुत संगम म्हणजे बहिर्जी अशी सखोल मांडणी प्रिसिजन वाचन अभियानाच्या विशेष कार्यक्रमात करण्यात आली.
एकीकडे सनई, तुतारी, तलवारी, घोड्यांचे आवाज तर दुसरीकडे तोफांचा गडगडाट सोबतीला मावळ्यांचा जयघोष अशा भारवणाऱ्या वातावरणात आनंद देशपांडे यांनी तो बहिर्जी होता या पुस्तकातील 12 कथा श्रोत्यांच्या पुढ्यात मांडल्या आणि जणू निर्मल कुमार फडकुले सभागृहात इतिहास जागा झाला.
प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.२५ वाजता, सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडके सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या “तो बहिर्जी होता…” या विशेष कार्यक्रमात बहिर्जी नाईक यांच्या पराक्रमाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा कलात्मक मागोवा घेण्यात आला.
या कार्यक्रमात ॲड. आनंद रा. देशपांडे लिखित “तो बहिर्जी होता…” या संकल्पनेवर आधारित सादरीकरण झाले. यामध्ये लेखक आनंद देशपांडे आणि कौस्तुभ गोडबोले यांनी पुस्तकातील निवडक १२ कथांचे प्रभावी अभिवाचन केले. या अभिवाचनातून बहिर्जी नाईक केवळ एक व्यक्ती नसून, महाराजांच्या विचारविश्वातील एक अविभाज्य श्वास कसे होते, हे रसिकांसमोर उलगडत गेले.
बहिर्जींचं कार्य हे एखाद्या खात्यापुरतं मर्यादित नव्हतं. “हे महाराज आणि बहिर्जी यांच्यातील अतूट नातं होतं,” असे स्पष्ट करताना वक्त्यांनी सांगितले की, मोहिमेची आखणी, अपयशाची शक्यता, पर्यायी निर्णय आणि संकटसमयीचा मार्ग या साऱ्यांची सूक्ष्म रणनीती बहिर्जी नाईक यांच्याकडे असे. “बहिर्जींनी काय केलं हे सर्वांना माहीत आहे, पण कसं केलं, हे फार थोड्यांना ठाऊक आहे,” असे मत आनंद देशपांडे यांनी मांडले.
यावेळी कौस्तुभ गोडबोले म्हणाले, “शिवाजी हा तीन अक्षरी मंत्र मनापासून जगणारा माणूस म्हणजे आनंद देशपांडे.” त्यांच्या शब्दांतून इतिहासाबद्दलची आस्था आणि बहिर्जींच्या कार्याविषयीचा आदर प्रकर्षाने जाणवत होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आनंद देशपांडे यांचा परिचय प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी करून दिला, तर प्रास्ताविक विनायक दुदगी यांनी केले.
इतिहास, साहित्य आणि वाचन चळवळीशी नातं सांगणाऱ्या रसिकांसाठी हा कार्यक्रम केवळ एक सादरीकरण न राहता, स्वराज्याच्या अदृश्य शिल्पकाराला दिलेला जिवंत मानवंदनाच ठरला.



















