पुणे , 2 जुलै (हिं.स.) : लोणावळ्यातील भुशी धरणात घडलेल्या दुर्घटनेनंतर वनक्षेत्रात असलेल्या पर्यटनस्थळांमध्ये सूर्यास्तानंतर प्रवेशावर बंदी आहे. या नियमाचे जिल्ह्यात यापुढे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यापुढे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या निर्धारित करून त्यांना ऑनलाइन पर्यटक परवाना देण्यासाठी व्यवस्था तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.लोणावळ्यातील भुशी धरणात बुडून हडपसरमधील एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर परिपत्रक जारी केले आहे.
त्यानुसार वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांमध्ये सूर्यास्तानंतर प्रवेशबंदीच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. हा नियम जुनाच असला तरी अशा पर्यटनस्थळांवर सर्रास पर्यटक दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. यापुढे या निर्णयाची अमंलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.