बार्शी – येथील श्री शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विषयात सहाय्यक पदावर कार्यरत असणारे डॉ. राहुल भगवान पालके हे विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत आदिवासी आणि प्रादेशिक भाषा व साहित्य या विषयात नेट परीक्षेत(राष्ट्रीय पात्रता चाचणी) उत्तीर्ण झालेले आहेत. विशेष म्हणजे ते नेट/ सेट ही परीक्षा या वेळेस २० व्यांदा उत्तीर्ण झालेले आहेत.
अगोदर ते या परीक्षा इंग्रजीत ११ वेळा, मराठीत २ वेळा, हिंदीत २ वेळा, वुमेन स्टडीज, तुलनात्मक साहित्य, भाषाशास्त्र तसेच अर्थशास्त्र या विषयांत प्रत्येकी १ वेळा उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अमिताव घोष यांच्या कांदबरी लेखनावरील अभ्यासासाठी पीएच.डी. ही पदवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून प्राप्त झालेली आहे. ते गेली ११ वर्षे श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे सहाय्यक प्राध्यापक अध्यापन करीत आहेत. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे.
या नेट परीक्षेत त्यांना आदिवासी आणि प्रादेशिक भाषा व साहित्य या विषयात एकूण १६० गुण प्राप्त झाले असून पर्सेंटाईल स्कोर ९२.१३ असा आहे. त्यांच्या या यशात यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालयाचा सिंहाचा वाटा आहे असे ते सांगतात. मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेत नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. त्याचबरोबर त्यांनी यावेळेस आदिवासींच्या संस्कृतीचा अभ्यास असलेला आदिवासी साहित्य व भाषा हा विषय नेट परीक्षेसाठी निवडला होता.
साहित्याबद्दल विशेष रुची असून त्यांचे ३ काव्यसंग्रह तसेच कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनावरील काव्यसंग्रह व समीक्षात्मक चरित्रग्रंथाचे व कर्मवीर प्रेरणा या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेले आहे. त्यांच्या शैक्षणिक संपादनासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे.
























