मुक्रमाबाद – अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ गोजेगाव द्वारा स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात भारतीय सैन्य दलात 22 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून मायभूमीत परत आलेले मुक्रामाबाद नगरीचे भूमिपुत्र व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व्यंकटेश बाबुराव सूर्यतले यांचा व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच प्राचार्य,स्वामी विवेकानंद महाविद्यालय , प्राचार्य, छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, मुख्याध्यापक,श्री. छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालय, मुख्याध्यापक, छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय, मुख्याध्यापक शिवमुर्तीआप्पा मळगे प्राथमिक विद्यालय तसेच प्राचार्या, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर नर्सिंग महाविद्यालय, मुक्रमाबाद या सर्व युनिटच्या वतीने देखील व्यंकटेश सूर्यतले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अनुसया शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव, व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब हे होते. सुरुवातीला अक्षय कुमार मार्शल अकॅडमी मुंबई यांचे प्रात्यक्षिक दाखवून लाटी काठी व दांडपट्टा याद्वारे महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुखेड येथील राजे छत्रपती सैनिक प्रशिक्षण अकॅडमी चे संचालक मा. ज्ञानेश्वर पाटील डुमणे हे होते. यावेळी विचारपीठावर, सरपंच प्रतिनिधी .बालाजी बोधने, सत्कारमूर्ती व्यंकटेश सूर्यतले, त्यांच्या पत्नी सूर्यतले ताई, शुकूरसाहेब कुरेशी, तसेच बालाजी पाटील गोजेगावकर.डाँ.झरिकर साहेब. इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे श्री.ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांनी आपले विचार मांडताना भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक जवानांचा असा कार्यक्रम घेतला पाहिजे, हा कार्यक्रम घेतल्याबद्दल त्यांनी मा. व्यंकटराव पाटील गोजेगांवकर साहेब यांचेही अभिनंदन केले. पत्रकार रजाक कुरेशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
तर तंटामुक्तीचे अध्यक्ष गौसखा पठाण यांनी कवितेच्या माध्यमातून आपले विचार मांडले.
सत्कारमूर्ती व्यंकटेश सूर्यतले यांनी सैन्य दलात स्वतः केलेले कार्य व या महाविद्यालयात घेतलेले शिक्षण याबद्दलच्या आठवणी सांगितल्या व तरुण विद्यार्थ्यांनी सैन्य भरती मध्ये सामील व्हावे आणि देश सेवेसाठी प्रण घ्यावे. अशा प्रकारचे आव्हान केले. अध्यक्षीय समारोपात मा.व्यंकटराव पाटील गोजेगांवकर साहेब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भारताच्या सुरक्षेसाठी सैन्यात दाखल होणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व सांगितले तसेच आपल्याच महाविद्यालयातला विद्यार्थी सैन्य दलात सेवा करून चांगल्या पद्धतीने मायभूमीत परत आल्याबद्दल त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला, तसेच यावेळी संजय गायकवाड यांनी त्यांच्या कलापथकाचे प्रात्यक्षिके दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी अमरजीत सिंह ठाकूर यांचाही सत्कार केला.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व मूक्रमाबाद परिसरातील सरपंच, उपसरपंच,पोलीस पाटील व नागरिक या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सुरेख असे सूत्रसंचालन प्रा. डॉ.मा.म.गायकवाड यांनी केले तर आभार प्रा.डॉ.बी.पी.खराबे यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील कर्मचारी,विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















