सोलापूर : ऊस कापणीनंतर शेतात शिल्लक राहिलेले पाचट जाळणे म्हणजे जमिनीची सुपीकता जाळण्यासारखे आहे. पाचट न जाळता ते शेतातच कुजवा, ज्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारेल आणि शाश्वत शेतीचा पाया रचला जाईल,” असा संदेश जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिला. मंद्रूप येथे शेतावर आयोजित विशेष प्रात्यक्षिकावेळी भोसले यांनी पाचट व्यवस्थापनाचे फायदे सांगितले.
यावेळी कृषी अधीक्षक भोसले म्हणाले की, पाचट कुजल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. ज्यामुळे जमिनीची जलधारण क्षमता सुधारते. याउलट, पाचट जाळल्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव आणि मित्रकीटक नष्ट होतात, ज्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर होतो. पाचट व्यवस्थापनामुळे रासायनिक खतांवरील खर्चात मोठी बचत होत असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना सांगितले.
यावेळी कृषी अधिकार्यांनी प्रसाद शेंडगे यांच्या शेताला भेट दिली. येथे त्यांनी इस्राईल तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या ऊस लागवडीची पाहणी केली. आधुनिक पद्धतीने लागवड, अचूक खत व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी नियोजन केल्यास ऊस उत्पादनात विक्रमी वाढ कशी करता येईल असे भोसले यांनी सांगितले.
यावेळी विकास वाघमोडे हे ८-१० वर्षांपासून परिसरामध्ये ‘ऊस पाचट कुट्टी’ करून देण्याचे काम सातत्याने करत असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
बदलत्या हवामानात आणि अनिश्चिततेच्या काळात शेतकऱ्यांनी आता केवळ पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता आधुनिक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अभ्यास करून केलेली फुलशेती शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी नक्कीच आणू शकते, असा विश्वास तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी व्यक्त केला. पारंपारिक पिकांमध्ये खर्च जास्त आणि उत्पादन मर्यादित असते. त्याऐवजी आधुनिक ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन आणि मल्चिंग पेपरचा वापर करून फुलांचे दर्जेदार उत्पादन घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंद्रूपचे सहाय्यक कृषी अधिकारी रमेश फरताडे,. चंद्रकांत कुंभार, प्रसाद शेंडगे , विद्यानंद हिरेमठ, नितीन खराडे , प्रकाश वाघमोडे, अनिल खट्टे, महेश कचरे, संगण्णा गुंडके यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…..
….
कृषी अधीक्षक थेट बांधावर
..,..
शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देण्यासाठी व शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले व तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी
थेट शेतकर्याच्या बांधावर पोहोचले. त्यामुळे मंद्रूप परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, अधिकार्यांच्या मार्गदर्शनामुळे आधुनिक शेतीकडे वळण्याचा संकल्प केला आहे.

















