तभा फ्लॅश न्यूज/माहूर : नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाच्या दिवशी माहूरगडावर देवदर्शनासाठी आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील भाविकांच्या तीनचाकी ऑटोची व मालवाहू पिकअप वाहनाची जोरदार धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात एक ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना दि.०९रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास पुसद रोडवरील उखळी घाटात घडली.ऐण रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी ही दुर्दैवी अपघाताची घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
माहूरगडावर सुरू असलेल्या परिक्रमा यात्रेत दिग्रस जिल्हा यवतमाळ येथील भाविक विजय पंजाब थोरात (२५), अर्जुन प्रकाश हुडे (३०), सुनिल महादेव शिंदे (३०), युवराज संजय शेंडे (२२), राजेश सुभाष राठोड (४०) व संतोष सिताराम गादेकर (४५) हे सहा जण प्रवास करीत असलेल्या ऑटोस समोरून येणाऱ्या पिकअप क्रमांक. एमएच २६ ए डी ६३४० जोरदार धडक दिली. यात ऑटोतील सहाही जणांना गंभीर दुखापत झाली. सर्व गंभीर जखमींना १०८ रुग्णवाहीकेद्वारे माहूरच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विपिन बाभळे,डॉ.अभिजित अंबेकर, नर्सिंग अधिकारी दता पालटवार, मुधोळकर,मिना शिवशेटी यांनी प्रथमोपचार करून या अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णवाहीके द्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे संदर्भित करण्यात आले. यापैकी अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या अर्जुन हुडे वय ३० याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे कळाले.
माहूरगड येथील श्री दत्तात्रेय शिखर संस्थान दत्तात्रेय मंदिर येथे सुरू असलेल्या नारळी पौर्णिमा यात्रे दरम्यान अपघाताची मालिका बघायला मिळत असून, किरकोळ व मोठ्या अपघाताचे डझनांवर रुग्णांनावर माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्याची दफ्तरी नोंद आहे.