सोलापूर – “स्त्री केवळ कुटुंबाचा आधार नसून ती समाजाच्या प्रगतीचा मुख्य कणा आहे. महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखून आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी होणे, ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे,” असे मत पुणे येथील अन्नपूर्णा परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा पुरव-सामंत यांनी व्यक्त केले.
येथील श्री हिराचंद नेमचंद वाचनालयातील लोकमान्य टिळक सभागृहात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘महिलांचे सक्षमीकरण’ या विषयावर त्यांचे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाच्या जेष्ठ कार्यकारिणी सदस्या प्रा.सुलभा पिशवीकर होत्या.
*स्वयंसिद्ध होण्याचा कानमंत्र*
डॉ. मेधा पुरव-सामंत यांनी आपल्या भाषणात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनावर विशेष भर दिला. त्या म्हणाल्या की, जोपर्यंत महिला कुटुंबाच्या आर्थिक निर्णय प्रक्रियेत सहभागी होत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होणार नाही. पुण्यासारख्या शहरात काम करताना आलेले अनुभव सांगताना त्यांनी बचत गट, लघुद्योग आणि कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व विषद केले. केवळ साक्षरता नव्हे, तर ‘डिजिटल साक्षरता’ ही महिलांसाठी आजच्या युगातील शस्त्र असल्याचेही त्यांनी नमूद केले.
*सामाजिक बदलाची हाक*
महिलांवरील होणारे अन्याय आणि कौटुंबिक हिंसाचार यावर भाष्य करताना डॉ. सामंत यांनी स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात घरापासूनच व्हायला हवी, असे सांगितले. मुला-मुलींना समान संधी आणि संस्कार दिल्यास भविष्यात एक सशक्त समाज निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.पिशवीकर यांनी महिलांनी निर्धार केल्यास आणि गरजा लक्षात घेऊन तसेच निर्णय घेतल्यास. त्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात.
या कार्यक्रमात वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी वाचनालयाच्या उपक्रमांची माहिती प्रास्ताविकेतून दिली. तर अँड. नीला मोरे यांनी सूत्रसंचालन केले, आणि आभार मानले. याप्रसंगी प्रा. पुष्पा आगरकर, डॉ. माधवी रायते, डॉ. सुमन सरदेसाई, सरिता मोकाशी, रवींद्र मोकाशी, पद्माकर कुलकर्णी फय्याज शेख, गायक प्रशांत देशपांडे निशा भोसले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.























