जेऊर – करमाळा तालुक्यातील रावगाव येथील सुपुत्र लक्ष्मण बुधवंत यांच्या संकल्पनेतून आणि हैदराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते वेणू कुमारजी चुक्ला यांच्या सहकार्याने दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत तिरुपती बालाजी देवदर्शन घडवून आणणारा एक अनोखा, प्रेरणादायी व सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम यंदाही यशस्वीरीत्या पार पडला.
श्री अष्टोदरा शता: १०८ चुक्ला चॅरिटेबल ट्रस्ट, हैदराबाद आणि वेणू व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट, रावगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंध्र प्रदेशातील पिरमलु येथील १०८ दिव्यांग विद्यार्थ्यांची श्री तिरुपती बालाजी देवदर्शन यात्रा भक्तिभावपूर्ण वातावरणात आणि काटेकोर नियोजनात संपन्न झाली.
हा उपक्रम केवळ यंदाच मर्यादित नसून, गेल्या सलग बारा वर्षांपासून लक्ष्मण बुधवंत यांच्या पुढाकारातून दिव्यांग विद्यार्थ्यांना तिरुपती बालाजी देवदर्शनाचा लाभ देण्यात येत आहे. “दरवर्षी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद, समाधान आणि भक्तीभाव पाहिल्यावर खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा केल्याचे समाधान मिळते,” अशी भावना लक्ष्मण बुधवंत यांनी व्यक्त केली.
या पवित्र यात्रेदरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांना तिरुमला येथील श्री वेंकटेश्वर (बालाजी) भगवानाचे मनोभावे दर्शन घडले. दर्शनावेळी “गोविंदा गोविंदा”, “जय बालाजी जय जय बालाजी” या जयघोषांनी संपूर्ण तिरुमला परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहून उपस्थित भाविकही भावूक झाले.
या यात्रेच्या आयोजनात प्रवास, निवास, भोजन तसेच देवदर्शनाची संपूर्ण व्यवस्था अत्यंत काळजीपूर्वक आणि शिस्तबद्धरीत्या करण्यात आली होती. यात्रेप्रसंगी चुक्ला चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा वेणू कुमारजी चुक्ला, लक्ष्मण बुधवंत, डॉ. योगेश पाटील यांच्यासह ट्रस्टचे कर्मचारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) चे अध्यक्ष, सर्व ट्रस्टी व कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा न येता सुरक्षित आणि सुलभ देवदर्शनाचा लाभ मिळाला.
दिव्यांगांच्या जीवनात आत्मिक समाधान, सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण करणारा हा उपक्रम केवळ धार्मिक नसून सामाजिक संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे. चुक्ला चॅरिटेबल ट्रस्ट आणि वेणू व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या या स्तुत्य कार्याबद्दल समाजातील विविध स्तरांतून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
























