करमाळा – कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू झाले असुन लाभक्षेत्रातील सर्व पाणीसाठ्यात पाणी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा मतदार संघातील विविध प्रश्नाबाबत सभागृहात आवाज उठवला असुन कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे केली होती.
या मागणीस यश मिळाले असून सध्या मोरवड ता करमाळा येथे पाणी येऊन दाखल झाले आहे. याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील उत्तर भागातील पिकांना वेळीच पाणी मिळाले पाहिजे यासाठी आपण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटुन कुकडी आवर्तन सुरू करावे अशी मागणी केली होती.त्यानुसार मागेच पाणी सोडण्यात आले व आज अखेर पाणी करमाळा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात पोहचले आहे. योग्य ते पाणी नियोजन करुन उपलब्ध चाऱ्यांमधून पाणी देण्यात यावे अशी सुचना आपण अधिकाऱ्यांना दिली आहे.
करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्रात तब्बल नऊ दिवस पाणी राहणार आहे. कुकडीचे पाणी नियोजनबद्ध पद्धतीने दिले जाणार असुन शेतकऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावे असे आवाहन आमदार नारायण आबा पाटील यांनी यावेळी केले .

























