पंढरपूर – “मानवी जीवनात कलेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, कारण कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती मानवी भावविश्वाची अभिव्यक्ती आहे. माणूस विचार, भावना, अनुभव आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी कलेचा आधार घेतो. चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य अशा विविध कलाप्रकारांमधून मानवी जीवनातील आनंद, दुःख, संघर्ष, आशा-निराशा यांचे सूक्ष्म दर्शन घडते. त्यामुळे कला ही मानवी अस्तित्वाशी निगडित असलेली मूलभूत गरज ठरते.”, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध भारूडकार सौ. संध्या साखी यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सव स्पर्धा २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव हे होते.
सौ. साखी पुढे म्हणाल्या की, “तणावमुक्त जीवनासाठी प्रत्येकाने कलेबद्दल प्रेम आणि आदर बाळगणे आवश्यक आहे. वास्तुशिल्प, खेळ, गायन, वादन यांसारख्या कोणत्याही कलेत प्रावीण्य मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास आणि गुरुंचे मार्गदर्शन आवश्यक आहे. समाजपरिवर्तनासाठी चिकित्सक बुद्धीचा वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कलेची प्रामाणिक साधना केल्यास युवकांना व्यसनाधीनतेपासून दूर राहता येते”, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी समाजप्रबोधनपर भारूड सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठस्तरावर संधी मिळत नसल्याने महाविद्यालयीन स्तरावर अशा स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुजाण कलाकार घडविणे आणि त्यांच्यामार्फत समाजप्रबोधन घडविणे हे महाविद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ. सुशील शिंदे, डॉ. राजेश कवडे, डॉ. भगवान नाईकनवरे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, डॉ. समाधान माने, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अमर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मारुती नायकू यांनी केले. त्यामध्ये त्यांनी या सांस्कृतिक महोत्सवात लोकगीते, लोककला, लोकनृत्य, गीतगायन, वाद्यवृंद, शास्त्रीय वादन, नाट्य व एकांकिका सादरीकरण असे एकूण ३४ कलाप्रकार सादर होणार असून महाविद्यालयातील सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असल्याचे नमूद केले.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. भारती सुडके व प्रा. सारिका भांगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

















