लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झाले असून आता दिल्लीत नवीन सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. आज दिल्लीत एनडीएची महत्त्वाची बैठक होत आहे. तर विरोधी पक्ष इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यासाठी देशातील महत्त्वाच्या पक्षाचे नेते दिल्लीला पोहोचत आहेत. एनडीएच सरकार स्थापन होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे देखील दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. तर, तेजस्वी यादव हे देखील इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला निघाले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते एकाच विमानाने दिल्लीला निघाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
तेजस्वी यादव आणि नितीश कुमार हे दोघेही विस्तारा फ्लाइट UK-718 ने सकाळी १०:४० वाजता दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. दिल्लीत एनडीएच्या बैठकीला मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहणार आहेत. तेजस्वी संध्याकाळी भारत आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. टीडीपी आणि जेडीयू दिल्लीत भाजपला समर्थन पत्रे सादर करतील आणि त्यानंतर एनडीए सरकार स्थापन करण्याचा दावा करणार.
नितीश कुमार यांना इंडिया आघाडीकरुन दिलेल्या कथित ऑफरवर केंद्रीय मंत्री गिरीराज यांनी टोमणा मारला आहे. आमचा नारा ४०० पार नारा होता आमचा… तुकडे तुकडे गँगला २३१ जागा.. आणि एकट्या भाजपला २४४ जागा मिळाल्या आहेत. ते नितीश कुमारांना निमंत्रित करत आहेत, असं ते म्हणाले.