पंढरपूर – राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव सुरू आहेत. परंतु, पंढरीच्या या पावन नगरीतील ग्रंथोत्सव वाचन आणि ग्रंथालय चळवळीचा उद्देश खरोखर सफल करणारा ठरला आहे. ग्रंथ आणि वाचन ही पवित्र, समाज हिताची चळवळ वाढली पाहिजे, समृद्ध झाली पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. ग्रंथालयांनी वाचकांची वाट न पाहता आपणच वाचकांपर्यंत जाण्याचा संकल्प नवीन वर्षात करावा, असे आवाहन राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय, सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि सोलापूर ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचा समारोप झाला. याप्रसंगी गाडेकर यांनी चळवळीत काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी ग्रंथमित्र कुंडलिक मोरे होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जोतिराम गायकवाड, मराठी भाषा अधिकारी प्रमोद पाटील, ग्रंथालय निरीक्षक संजय ढेरे, प्रदीप गाडे प्रमुख उपस्थित होते.
गाडेकर म्हणाले, ग्रंथालयांनी दर्जेदार ग्रंथ, वाचन साहित्य वाचकांना उपलब्ध करून दिले पाहिजे. सोलापूर जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ अतिशय सक्षम असून त्यासाठी कार्यक्षम जिल्हा ग्रंथालय अधिकारी भेटले आहेत. जिल्हा समन्वय समितीकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची भावना व्यक्त झाल्या असून त्यानुसार सुधारणा करण्याचा प्रयत्न आपण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अध्यक्षपदावरून बोलताना कुंडलिक मोरे यांनी जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीचा आढावा घेतला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी प्रास्ताविक केले. साहित्य आणि ग्रंथ हे समाजात परिवर्तनाचे काम करतात. वाचकांना अंतर्मूख होऊन जगण्याचे बळ देतात. वाचक हा या चळवळीचा आत्मा आहे. त्यामुळे वाचक वाढले तरच चळवळीला अर्थ आहे. त्यादृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करूयात, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ठ ग्रंथपाल, वाचक तसेच पुस्तक प्रकाशकांचा प्रातिनिधीक सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी तानाजी जाधव, प्रशांत जाधव, विनोद गायकवाड, फुलचंद नागटिळक, अन्सर शेख, कृष्णदेव मदने, रवी गाजरे, सुभाष सुडके, राजेश पवार, रामदास नागटिळक, हणमंत शिंदे, विनायक गुरव आदींनी परिश्रम घेतले. जिल्ह्यातील पदाधिकारी, वाचक, कार्यकर्ते उपस्थित होते. जोतिराम गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
सकाळच्या सत्रात साहित्यिक राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन झाले.कथाकार जयवंत आवटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यानंतर दुपारी ‘राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्व’ या विषयावर परिसंवाद झाला.प्रा.डॉ. चंद्गकांत चव्हाण, लेखक गोविंद काळे, प्रा.डॉ.सुशिला पिंजारी या मान्यवरांनी सहभागी होत विचार मांडले.
—————-
ग्रंथोत्सवात पुस्तकांची मोठी विक्री
ग्रंथोत्सवाचे औचित्य साधून अनेक प्रकाशकांनी पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल उभारले होते. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक संचालक सुनील हुसे यांनी अधिकाधिक ग्रंथ खरेदीचे आवाहन केले. त्यानुसार दोन दिवसांत प्रत्येक ठिकाणी शेकडो पुस्तकांची विक्री झाली. वाचन चळवळीसाठी ही बाब अतिशय सुखद असल्याचे हुसे यांनी नमूद केले.
























