सोलापूर – शहरातील उत्तर तहसील कार्यालयातील अभिलेख (रेकॉर्ड) कक्ष गेल्या पंधरा दिवसांपासून बंदच आहे. त्यामुळे गावातून कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांना तीव्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. जमीन व्यवहार, फेरफार नोंदी, हस्तलिखित उतारे तसेच महसूल विषयक विविध कागदपत्रांसाठी दररोज सकाळपासून मोठ्या संख्येने नागरिक तहसील कार्यालयात दाखल होत आहेत. मात्र अभिलेख कक्ष बंद असल्याचे समजताच नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, जुने फेरफार, मालमत्ता व्यवहारासाठी आवश्यक कागदपत्रे, वारसा नोंदी, दुरुस्ती अर्ज अशा महत्त्वाच्या कामांसाठी अनेक नागरिक दूरवरून उत्तर तहसील कार्यालयात येत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता अभिलेख कक्ष बंद ठेवल्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाया गेल्याची भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अनेकांनी खास कामानिमित्त रजा काढून तहसील कार्यालयात हजेरी लावली होती; मात्र प्रत्यक्षात कक्ष बंद असल्याने त्यांना निराशेने परतावे लागले.या परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांसह शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच वकिल व दस्तऐवज लेखकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसभर कार्यालयाच्या फेऱ्या मारूनही काम न झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “अभिलेख कक्ष कधी सुरू होणार, याची कोणतीही माहिती दिली जात नाही. विचारणा केली असता समाधानकारक उत्तरही मिळत नाही,” अशी तक्रार अनेक नागरिकांनी केली.
विशेष म्हणजे, उत्तर तहसील कार्यालयासोबतच दक्षिण तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षही बंद असल्याने संपूर्ण सोलापूर शहरातील नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे. दोन्ही तहसील कार्यालयांतील अभिलेख कक्ष बंद असल्यामुळे जमीन व्यवहार, फेरफार नोंदी, बँक कर्ज प्रकरणे तसेच न्यायालयीन कामांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळणे अशक्य झाले आहे. परिणामी महसूल विभागाशी संबंधित कामकाज जवळपास ठप्प झाले आहे. या गंभीर प्रकाराकडे महसूल प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अभिलेख कक्ष बंद ठेवण्यामागील कारण स्पष्ट करावे, तातडीने कक्ष सुरू करावा तसेच भविष्यात अशा परिस्थितीत नागरिकांना आधीच अधिकृत सूचना देण्याची प्रभावी व्यवस्था उभारावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. अन्यथा नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहे.



















