बार्शी – येथील बार्शी तहसील कार्यालयातील कर्मचारी जेलर संदीप नालपे यांनी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचा अंत्यविधी सुरु असताना बार्शी तहसील कार्यालय येथे फटाके फोडून, मिठाई वाटून व केक कापून वाढदिवस केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तात्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दि.२८ जानेवारी रोजी निधन झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या घरातील व्यक्ती गेल्याची भावना निर्माण झाली. त्यातच महाराष्ट्र शासनाने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता. राज्यभर शोककळा असताना दुसऱ्या दिवशी स्व. अजितदादा पवार यांच्यावर अंत्यसंस्कार सुरु असाताना बार्शी तहसील कार्यालयातील कर्मचारी संदीप नालपे याने स्वतःचा वाढदिवस फटाके फोडून, मिठाई वाटून व केक कापून साजरा केला.
यावेळी तहसील कर्मचारी जेलर संदीप नालपे यास प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी सदरच्या कृतीबाबत विचारले असता पत्रकारांनाही नालपे याने अरेरावी करत शिविगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जेलर नालपे यांचे वर्तन असंवेदनशून्य असून सदरच्या घटनेमुळे महाराष्ट्रासह बार्शी तालुक्यामध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बार्शीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांना निवेदन देऊन सदरच्या मुजोर कर्मचारी संदीप नालपे याची बदली करुन तात्काळ निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदरची कारवाई न केल्यास दि.१५ फेब्रुवारीपासून बार्शी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. विवेक गजशिव, शहराध्यक्ष धनंजय जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अॅड. विक्रम सावळे, तालुकाध्यक्ष बापूसाहेब चोबे, शिक्षक सहकार संघटना राज्य उपाध्यक्ष उमेश नायकुडे, तालुका उपाध्यक्ष वैभव जाधवर, अश्वकुमार अहिरे, आनंद चव्हाण, सूरज भालशंकर, साहिल शेख आदी उपस्थित होते.















