कल्याण-नगर महामार्गावर एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२३ जानेवारी) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको कार यांच्यात अहमदनगर जिल्ह्यातील ढवळापूर फाट्यानजीक मध्यरात्री अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.