मुंबई, १५ नोव्हेंबर (हिं.स.) : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘आम्ही हे करू’ या टॅग लाईनने पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. हा जाहीरनामा चार भागांत विभागला आहे.
मनसेचा जाहीरनाम्यात चार भाग आहेत. पहिल्या भागात मूलभूत गरजा, दुसऱ्या भागात दळणवळण, वीज, पाणी नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण जैवविविधता यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या भागात प्रगतीच्या संधी आणि राज्याचे कृषी धोरण आणि चौथ्या भागात मराठी अस्मिता हा विषय घेण्यात आल्याचे राज ठाकरे म्हणाले.
ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १९ वर्षे झाले आहेत. या १९ वर्षांत मनसे काय, काय केले? त्याची माहिती यात दिली आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करू इतकाच दिला आहे. पण, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू आणि कसं करू या गोष्टी देखील अंतर्भूत केल्या आहेत.
मी २००६ मध्ये राज्याची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईल सांगितलं होते. ती २०१४ ला आली. पण या काळात मला हिणवलं गेलं. कुत्सितपणे प्रश्न विचारलं गेलं. २०१४ ला ती प्रसिद्ध झाली. त्यावेळी युती तुटली होती. पण गेल्या दहा वर्षांत ब्ल्यू प्रिंटमध्ये काय आहे, कशी केली वगैरे कुणी मला विचारलं नाही. आमच्या जाहीरनाम्यामध्ये ब्ल्यू प्रिंटच्या अनेक गोष्टी आणलेल्या आहेत याचं कारण विषय बदलले नाहीत, प्रश्न बदललेले नाहीत, अद्यापही तेच प्रश्न आहेत. अद्यापही आपण त्याच प्रश्नांवर चर्चा करत आहोत, म्हणून मला असं वाटतं की आज हा जाहीरनामा तुमच्यासमोर ठेवत आहे. माझ्या हातात ही गोष्ट येईल, या आशेने आपण जाहीरनामा समोर ठेवतो. इतर पक्षांनी जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. त्यांना खात्री आहे का ते विजयी होतील. बाकीचे लोकांनी माझ्यापेक्षा कमी उमेदवार उभे केले. कोणती युती घेऊन बसला. त्या युतीत वेगवेगळे पक्ष वेगवेगळे होर्डिंग्ज लावत आहेत. त्याचा विचार करा, असंही ठाकरे यावेळी बोलताना म्हणालेत.
विद्यामंदिरं उभी करणे, गडकिल्ल्यांचे संवर्धन महत्वाचे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात राज्यभरात शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करणार, असे म्हटलं आहे. पण त्याऐवजी राज्यात विद्यामंदिरं उभी करणे महत्त्वाचे आहे आणि राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे. महाराष्ट्रात चौकाचौकात शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मग शिवाजी महाराजांच्या मंदिरांची गरज काय? त्याऐवजी राज्यातील मुलांना शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे आणि शिवरायांनी उभारलेले गडकिल्ले चांगले होणे महत्त्वाचे आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मनसेच्या जाहीरनाम्यात ‘लाडकी बहीण योजना’ किंवा ‘महालक्ष्मी योजना’ यासारख्या योजनांचा समावेश का नाही, या प्रश्नावर ते म्हणाले, याचं कारण महाराष्ट्राचं एकूण आर्थिक गणित पाहिल्याशिवाय मी असल्या घोषणा करु शकत नाही. असल्या घोषणांना अर्थ नसतो. महाराष्ट्रावर आर्थिक बोजा न येता या योजना सुरु राहिल्या, तर मी त्याला गिफ्ट म्हणेन. पण उद्या या गोष्टी सुरु राहिल्या नाहीत तर मी या योजनांना लाच म्हणेन. अशा योजना सुरु करताना राज्याचा आर्थिक ढाचा बिघडता कामा नये. सरकारकडून महिलांना पैसे मिळतात, याचा आनंदच आहे. पण या सगळ्यातून आपण काही वेगळे खड्डे तर खणून ठेवत नाही ना, हे देखील तपासले पाहिजे.