गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी देण्यात आलेले परवाने सन 2026 पर्यंत वैध असणार आहेत. त्यामुळे त्यांनी या वर्षी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या गणेशोत्सव मंडळांनी यापूर्वी परवानगी घेतलेली नाही, अशांनी नव्याने अर्ज करावे.यंदाचा दहीहंडी, गणेशोत्सवासह अन्य सण-उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा. त्यासाठी संबंधित यंत्रणा आणि मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
गणेशोत्सव, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने तयार केलेल्या नियमावलीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, उपआयुक्त संदीप गिल, आर राजा, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, विभागीय उपायुक्त वर्षा उंटवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कासगावडे उपस्थित होते.