एकाच दिवशी गणपती विसर्जन आणि ईद असल्यामुळे सर्वांनी मिरवणुकीच्या वेळा पाळाव्यात तसेच नियमांचे पालन करावे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मिरवणुकीचे रस्ते व्यवस्थित करून घ्यावे. डीजे – लाऊडस्पीकरचा आवाज 55 डेसीबलपेक्षा जास्त नसावा. दरम्यान सर्वांनी सोशल मिडीयाचा वापर जबाबदारीने करणे आवश्यक आहे असे प्रशासनाने स्पष्ट केले. नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत सदर सूचना प्रशासनाने दिल्या.
‘एक खिडकी’ योजनेंतर्गत गणपती मंडळांना सर्व परवानग्या देण्यात येणार आहे. तसेच मिरवणुकीच्या रस्त्यावर बॅनर, फटाके, कमानी लावण्यात येऊ नये. वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यासाठी संबंधित विभागाने योग्य नियोजन करावे. दाताळा रोडवरील इरई नदीत गणपती विसर्जनाची व्यवस्था मनपाने योग्य प्रकारे करावी.
सर्वांनी सोशल मिडीयाचा वापर जबाबदारीने करणे आवश्यक आहे. विशेष करून तरुणांनी. कोणत्याही परिस्थितीत आपल्या एखाद्या मॅसेजमुळे समाजभावना भडकणार नाही, यासाठी दक्ष असावे. जेष्ठ नागरिकांनी आपापल्या कुटुंबातील तरुणांना सोशल मिडीया वापराबाबत मार्गदर्शन करावे. सण – उत्सव हे आनंदाने आणि शांततेत पार पाडायचे असतात, याची सर्वांनी जाणीव ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, सामाजिक सलोखा आणि ऐक्य ही चंद्रपुरची परंपरा आहे. सण – उत्सव आनंदाने साजरे करून जिल्ह्याचा लौकिक कायम ठेवावा. गणेश मंडळाने सामाजिक विषयांवर देखावे करावेत. तसेच शासकीय परवानग्या देतांना लोकांना चकरा माराव्या लागू नये, याबाबत प्रशासनाने नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी केल्या.