भारताच्या ईशान्य भागात सिक्कीम, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार पर्यंतच्या परिसरात नवे रेल्वे रूळ टाकण्याचे 65 टक्के काम पूर्ण झालेय. डिसेंबर 2024 पर्यंत सिक्कीमच्या रग्पो ते गंगटोक पर्यंत वंदे भारत सुरू होईल. त्यानंतर ही रेल्वे चीन सीमेवरील नाथूला पर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती ईशान्य रेल्वेने दिली.
यासंदर्भातील माहितीनुसार नाथूला रेल्वे मार्गाची मंजुरी अतिम टप्प्यात असून लवकरच या प्रस्तावित रेल्वे मार्गाचा सर्व्हे सुरू होणार आहे. रंग्पो-गंगटोक मार्ग सेवक, रियांग, मेली स्टेशन तयार झाले आहेत. तिस्ता बाजारात भूमिगत स्टेशन केले जाणार आहे. त्रिपुराला बांगलादेश, आसामला भूतानशी जोडणाऱ्या 2 आंतरराष्ट्रीय सीमा रेल्वेमार्गाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. आणखी 3 रेल्वे प्रकल्प प्रस्तावित असून या माध्यमातून भारताला सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
यासोबतच आंतरराष्ट्रीय सीमापार रेल्वे प्रकल्पांतर्गत त्रिपुराची राजधानी आगरतला ते बांगलादेशातील अखौरा रेल्वेस्थानक जोडले जाईल. एकूण 862 कोटींच्या प्रकल्पात भारताचा 5 आणि बांगलादेशचा 10 किलोमीटरचा भाग येतो. याठिकाणी जून-2024 मध्ये पहिली चाचणी होईल. डिसेंबरपर्यंत रेल्वेमार्ग सुरू होईल. त्यामुळे आगरतला ते ढाका व कोलकाता येथे जाण्यास 6 तास लागतील. मणिपूरच्या इम्फाल ते मोरेहपर्यंत रेल्वे रूळ टाकले जात आहेत. मोरेह म्यानमार सीमेवर भारताचा शेवटचे क्षेत्र आहे. प्रकल्पाची डेडलाइन डिसेंबर 2024 आहे. दोन तृतीयांश काम पूर्ण झाले. नंतर हा मार्ग म्यानमारच्या तमू ते थायलंडपर्यंत वाढवण्याची तयारी असल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले.