बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्याने तो चर्चेत आला आहे. सलमानच्या ऑफिस मेल आयडीवर एक मेल पाठवत त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. आता धमकीनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सलमान म्हणाला, “जेव्हा जे व्हायचं असेल तेव्हा ते होईल”.
सलमानच्या एका जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, धमकी मिळाल्यानंतर सलमान खान घाबरलेला नाही. पण कुटुंबात अजून तणाव निर्माण होऊ नये यासाठी सगळं काही ठीक असल्याचं तो भासवत आहे. कुटुंबियांसाठी त्याने त्याचे सध्याचे प्लॅन्सदेखील रद्द केले आहेत. तो सध्या कोणत्याही सिनेमाचं शूटिंग किंवा प्रमोशन करत नाही.
मी धमक्यांना घाबरत नाही : सलमान खान
सलमानचा मित्र पुढे म्हणाला की, “सलमानला असं वाटतयं की, धमक्यांकडे जास्त लक्ष दिलं तर त्या धमकी देणाऱ्या व्यक्तीकडे जास्त लक्ष देत आहोत असं होईल, हे अत्यंच चुकीचं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीला मी काही म्हणालो तर त्याच्या प्लॅनमध्ये तो अधिक यशस्वी होईल. सलमान धमक्यांना घाबरणारा नाही. जेव्हा जे व्हायचं असेल तेव्हा ते होईलच, असं त्याचं मत आहे.”
सलमानला दुसऱ्यांदा धमकी मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांची मात्र झोप उडाली आहे. चाहतेदेखील सलमानसाठी चिंता व्यक्त करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते काळजी व्यक्त करत आहे.
सलमानला धमकीचा मेल आल्यानंतर त्याने यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांनी गॅंगस्टार गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गर्ग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.