दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर असलेले खासदार संजय राऊत यांना पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांना आवाहन करणे चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारबद्दल अप्रिय बोलल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात भादंवि 505 (1 )(ब) कलमा अंतर्गत पोलीस प्रति अप्रतिची भावना निर्माण करणे, चिथावणी देणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदार संजय राऊत हे शुक्रवारी (11 मे) नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना म्हणाले होते की, “राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीसांसह इतर अधिकाऱ्यांनी आदेशाचे पालन करु नये आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले होते.” हे आवाहन करणे संजय राऊत यांना महागात पडले आहे. नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदार संजय राऊत यांनी शनिवारी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने भाष्य केले. त्यावेळी त्यांनी राज्यातील सरकार हे अपात्र आमदारांच्या भरवशावर असल्याने ते बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने ते बेकायदेशीरच ठरवले आहेत. त्यामुळे अशा घटनाबाह्य आणि बेकादेशीर सरकारच्या आदेशांचे पालन करु नये, असा आवाहन केले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिकच्या शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. यावेळी ते म्हणाले होते की, सरकार बेकायदेशीर असून पुढील तीन महिन्यात सरकार कोसळणार आहे. त्यामुळे पोलिसांसह इतर अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर सरकारच्या आदेशाचे पालन करु नका. बेकायदेशीर आदेशाचे पालन केले तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील, असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.