देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ ही मोहिम देशभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची ही संक्षिप्त माहिती…
भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ ही मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. ग्रामस्तरापासून राष्ट्रीयस्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ग्रामपंचायतींमध्ये शहिदांचे नाव असणारे शिलाफलक बसवण्यात येणार आहेत. दिल्ली येथे निर्मित होणाऱ्या अमृत वाटिकेसाठी अमृत कलश यात्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातून माती आणली जाणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात ‘मेरी माटी, मेरा देश’ मोहिमेची घोषणा केली. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांना नमन करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी ही मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेत शूरवीरांच्या स्मरणार्थ देशभरात विविध कार्यक्रम आयोजिले आहे. शूरविरांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिल्ह्यातील 87 अमृत सरोवराजवळ शिलाफलक उभारले जातील. तसेच अमृत सरोवराच्या परिसरात प्रत्येकी 75 याप्रमाणे 6 हजार 525 भारतीय प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे.
‘मेरी माटी, मेरा देश ‘ हा भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्षे साजरी करणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम राहणार आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय, शहिद झालेल्या जवानांचे कुटुंबिय आणि माजी सैनिकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहे. गेल्या वर्षी ‘हर घर तिरंगा’ या देशव्यापी अभियानाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समरोपाला ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिम राबविण्यात येणार आहे.
शूरवीरांना आदरांजली म्हणून शिलाफलक बसवणे, मिट्टी का नमन आणि वीरों का वंदन हे ‘मेरी माटी, मेरा देश’ या मोहिमेचे प्रमुख घटक राहणार आहे. ‘मेरी माटी, मेरा देश’ या मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे. या मोहिमेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.
या मोहिमेमध्ये आपल्या शूरवीरांच्या बलिदानाला अभिवादन म्हणून स्वातंत्र्यसैनिक आणि सुरक्षा दलांना समर्पित शिलाफलकांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच पंच प्राण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहे. वीरहृदयांची गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाच्या भावनेला वंदन करणारे शिलाफलक, स्मारक फलक हे शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत. त्यामध्ये त्या-त्या भागातील शूरवीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्या नावाबरोबर पंतप्रधानांचा संदेश असेल. ही मोहीम १२ मार्च २०२१ रोजी सुरू झालेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’चा समारोप राहणार आहे. या कार्यक्रमांतर्गत भारतभरात दोन लाखाहून अधिक कार्यक्रम घेण्यात आले आहे. देशभरातील जनतेने यात व्यापक लोकसहभाग नोंदवला. दि. ९ ते ३० ऑगस्ट २०२३ दरम्यान ‘मेरी माटी, मेरा देश’ मोहिमेत गाव आणि गटस्तरावर, तसेच स्थानिक स्वराज संस्था तसेच राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर कार्यक्रमांचे आयोजन असणार आहे.
दिल्ली येथे ‘अमृत वाटिका’ तयार करण्यात येणार आहे. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७ हजार ५०० कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार आहे. जिल्ह्यात ग्रामस्तरावरून पंचायत स्तवरावर माती गोळा करण्यात येणार आहे. त्यानंतर तीन जिल्हास्तरावर एकत्रित केल्या जाईल. त्यानंतर शहिदांच्या कुटुंबियांच्या हस्ते दिल्ली येथील मुख्य कार्यक्रमासाठी अमृत कलश रवाना करण्यात येणार आहे. ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या वचनबद्धतेचे प्रतीक असेल.
या मोहिमेत लोकसहभागाला विशेष महत्व देण्यात आले आहे. लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कृतीतून लोक भारताला विकसित देश बनवणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि बंधुता टिकवून ठेवणे, नागरिकांची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांप्रति आदर व्यक्त करणे, यावर लक्ष केंद्रित करून पंच प्राणांची प्रतिकात्मक प्रतिज्ञा घेतात. अशा प्रकारे राष्ट्र प्रतिज्ञा घेतल्यानंतर सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहे. गेल्या वर्षीच्या सहभागामुळे ‘हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी झाला. या वर्षी देखील दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी सर्वत्र राष्ट्रध्वज फडकवावेत आणि तिरंग्यासोबत सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या देशव्यापी मोहिमेचा तपशील yuva.gov.in/meri_maati_mera_desh या पोर्टलवर उपलब्ध राहणार आहे. पोर्टलवर ‘मेरी माटी, मेरा देश’ मोहिमेतील विविध उपक्रमांची संबंधित माहिती देण्यात आली आहे. तरूणांनी या वेबसाइटवर सेल्फी आणि रोपे लावण्यासारखे उपक्रम अपलोड करून या पोर्टलद्वारे मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. युवक-युवतींनी या मोहिमेत उत्साहाने सहभागी व्हावे, तसेच आपल्या शूरवीरांना आणि आपल्या मातृभूमीला आदरांजली वाहण्यासाठी देशव्यापी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘मेरी माटी, मेरा देश’ मोहीम दि. 9 ऑगस्ट रोजी सुरू होईल. दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनापर्यंत नियोजित कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर दि. १६ ऑगस्ट २०२३ पासून गट, नगरपालिका, नगरपरिषद आणि राज्यस्तरावर होणार आहेत. दि. ३० ऑगस्ट २०२३ रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे समारोप होणार आहे.