मुंबईकरांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे, मुंबईत लवकरच 238 नव्या एसी लोकल दाखल होणार आहेत. रेल्वेने तसा निर्णय जाहीर केला आहे. रेल्वेनं तसा निर्णयच जाहीर केला आहे. मुंबईत सध्या धावत असलेल्या एसी लोकल नेहमी बिघडत असून त्यांचे स्वयंचलित दरवाजे देखील नेहमीच बिघडत असतात, त्यामुळे या एसी लोकलची पुढील आवृत्ती म्हणून वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत.
मुंबईत लवकरच दाखल होत असलेल्या एसी लोकल या वंदे भारत एक्सप्रेसच्या श्रेणीतल्या असतील. या नवीन अपग्रेडेड लोकलसाठी रेल्वेला जवळपास 20 हजार कोटींचा खर्च येणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. तर, कालांतराने मुंबईतील सर्वच लोकल वातानुकूलित करण्याचे रेल्वेचे टार्गेट आहे. ‘मेक इन इंडिया’ मार्गदर्शक तत्त्वांवर वातानुकूलित लोकलची बांधणी करण्यात येणार आहे.
मुंबईकरांना गारेगार अन् आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी रेल्वे बोर्डाने मुंबई उपनगरीय मार्गावर 238 वंदेभारत लोकल ट्रेनच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पांतर्गत 238 वंदे मेट्रो (उपनगरी) बांधणीला रेल्वे मंडळाने मंजुरी दिली. याबाबतचे पत्र देखील रेल्वे मंडळाने शुक्रवारी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला पाठवलं आहे.
या वंदे भारत लोकलचे तिकीट दर एसी लोकलप्रमाणेच जास्त असल्याने सर्वसामान्यांचा लोकल प्रवास मात्र महागण्याची शक्यता आहे. या लोकल वातानुकूलित असल्याने लोकलची दारं बंद राहतील, ज्यामुळे लोकलचा प्रवास अधिक सुरक्षित देखील होणार आहे. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही घोषणा केल्याचं आता बोललं जातंय.
नवीन वातानुकूलित लोकलच्या देखभालीसाठी मुंबईत दोन नव्या कारशेड उभारण्यात येणार असून त्यासाठी जागा देखील निश्चित करण्यात आल्या आहेत. लोकलच्या देखभालीसाठी डेपोच्या उभारणीला यापूर्वीच मंजूरी देखील मिळाली आहे. हे डेपो वंदे भारत तयार करणाऱ्या कंपन्यांच्या मदतीनेच बांधण्यात येणार आहेत. नवीन आधुनिक एसी लोकल या वंदे भारत मेट्रोच्या धर्तीवर बनवण्यात येणार आहेत.