प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा ई-पीक पाहणी अॅपद्वारे नोंदविणे गरजेचे आहे. ई- पीक पाहणीच्या नोंदी या पिक विमा दावे निकाली काढण्यासाठी पीक कर्ज वाटप, PM किसान योजना, यांत्रिकीकरण, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई व शासनाच्या विविध योजना ई. बाबीसाठी अनिवार्य आहे. चालू खरीप हंगामात पिक पेरा नोंदविण्यासाठी सुरवात १ जुलै २०२३ पासून सुरु झाली असुन ३१ जुलै २०२३ पर्यंत ठाणे जिल्ह्यात १३४५३. पालघर जिल्ह्यात ७७०४८. रत्नागिरी जिल्ह्यात ९५०९. रायगड जिल्ह्यात ९६६६५, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६४२७, अशी एकूण २,१३,१०५ एवढया क्षेत्राची नोंद मोबाईल अॅपद्वारे करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२३ च्या ई-पीक पाहणीची कार्यवाही १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण करावयाची आहे. सर्व शेतकऱ्यांनी अॅप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून खरीप हंगामातील पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी असे आवाहन श्री. अंकुश माने, विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे यांनी केले आहे.
गेल्या वर्षीच्या अॅपमध्ये सुधारणा करून नवीन सुविधायुक्त अँप (२.०.११) यावर्षी सुरू करण्यात आलेले आहे. नवीन सुविधामध्ये पुढील सुविधांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे नोंदवलेली पीक पाहणी ४८ तासांमध्ये स्वत:हून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल. किमान आधारभूत योजनेअंतर्गत येणाऱ्या पिकांची ई- पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार आहे. त्या आधारे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकाबाबत आज्ञावलीमध्ये स्वयम घोषणापत्र घेतले जाणार असून शेतकऱ्यांनी केलेली पिक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येईल. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी १० टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. तलाठी पडताळणीअंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होतील.
तरी शासनाच्या विविध योजनांचा लाभ, नुकसान भरपाई मदत व किमान आधारभूत किंमतीनुसार खरेदीच्या लाभाकरीता शेतकऱ्यांनी आजच पिकांची नोंद मोबाईल अॅपद्वारे करावी, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक कोकण विभाग ठाणे अंकुश माने यांनी केले आहे.