सांगली जिल्ह्यातील पेठ ते शिराळा या राज्यमार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. दोन कारची समोरासमोर धडक होऊन एकजण ठार झाला. अपघातानंतर वाहनांनी पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत एक कार पूर्णतः जळून खाक झाली. इस्लामपूरकडून शिराळाकडे जाणाऱ्या कारचालकाने भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने कार चालवल्याने अपघात झाला. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
या अपघातात शिराळा येथील संदीप आनंदा शेवाळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी दिपाली, मुलगा श्रीराज, मुलगी आराध्या व समोरील कारचे चालक संदीप मारुती लोंढे हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर संदीप लोंढे यांची कार पूर्णपणे जळून खाक झाली. इस्लामपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय आणून देणारी घटना सांगली जिल्ह्यात 15 दिवसांपूर्वी घडली होती. खानापूर तालुक्यातील भिवघाटजवळ एसटी बस चालवत असतानाच बस चालकाला अचानक चक्कर आली. शेजारीच असणाऱ्या वाहकाने प्रसांगवधान राखत बसचे स्टेअरिंग आपल्या हातात घेत बस कंट्रोल केली. त्यामुळे चालक-वाहकासह तब्बल 30 जणांचे प्राण वाचले. परळी-चिपळूण ही बस प्रवाशी घेवून भिवघाटमार्गे विट्याकडे येत होती. परंतु, ती येत असतानाच चालकाला अचानक चक्कर आली.
अचानक असे काय झाले म्हणून बसमधील सर्व प्रवाशी भयभीत झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून शेजारीच वाहक कम चालक असणाऱ्या कंडक्टरने बसचा ताबा घेतला आणि बस बाजूला घेतली. त्यामुळे चालक-वाहकासह तब्बल 30 जणांचे प्राण वाचले. तत्काळ त्याच अवस्थेत बस चालवत भिवघाट येथे आणण्यात आली. सदर चालकावर त्वरित उपचार करण्यात आले. सध्या चालक सुखरुप असून या घडलेल्या घटनेने मात्र प्रवाशांची मोठी भंबेरी उडाली होती.