अकलूज ते वेळापूर रस्त्यासाठी आशियाई विकास बँकेकडून सुमारे १५० कोटींचा निधी उपलब्ध करून चौपदरीकरण करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याची माहिती आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी दिली.
अकलूज- वेळापूर हा रस्ता श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी महामार्गांना व जिल्हा मुख्यालयाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन हा प्रलंबित राहिलेला रस्ता करण्यात यावा, अशी मागणी केली होती.
संत तुकराम पालखी सोहळा इंदापूर- अकलूज- माळीनगर- महाळुंग- श्रीपूर मार्गे बोंडले येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गास जाऊन मिळतो. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा माळशिरसवरून वेळापूरमार्गे पुढे जातो. अकलूज- वेळापूर या मार्गाचा दोन्ही पालखीतील वारकऱ्यांकडून वापर होतो.