माहूर – केंद्र शासनाच्या “भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना २०२५-२६” या प्रस्तावित योजनेंतर्गत माहूर नगरपंचायत अंतर्गत मंजूर विकास आराखड्यानुसार शहरातील ‘व्यापारी संकुल व वाहनतळ विकसित करणे’ यासाठी तब्बल १९ कोटी ७६ लाख ३१ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके भाऊ समजले जाणारे आ. भीमराव केराम यांनी याकामी
सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले हे मोठे यश असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
केंद्र शासनाच्या “भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य” या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनास निधी प्राप्त होत आहे. या योजनेंतर्गत प्रामुख्याने विविध नगरपरिषद /नगरपंचायत यांच्या विकास योजना आराखड्यातील कामांना निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सन २०२४-२५ च्या प्रस्तावित निधीतून सदर योजना राबविण्यासाठी विभागीय सह संचालक, नगर रचना, कार्यालयाच्या स्तरावरून विहित कार्यपद्धती अवलंबून योजनेंतर्गत प्रकल्पांकरिता वास्तुविशारद संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. सदर वास्तुविशारद संस्थेमार्फत तयार करण्यात आलेल्या प्रस्तावित विकास कामांच्या नकाशांना संबंधित सह संचालक, नगर रचना/सहायक संचालक, नगर रचना यांचे स्तरावरून मंजुरी देण्यात आली आहे. वास्तुविशारद संस्थेकडून उक्त प्रकल्पांतर्गतच्या विकास कामांची अंदाजपत्रके तयार करून, त्यांना तांत्रिक मंजुरी मिळण्यासाठीचे प्रस्ताव, संबंधित मुख्याधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायत यांनी “सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित कार्यालय किंवा संचालक, उपवने व उद्याने” यांचेकडे सादर करुन, अशा विकास कामांच्या अंदाजपत्रकांना, तांत्रिक मंजुरी प्राप्त करुन घेतल्या आहेत. केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना २०२५-२६ या प्रस्तावित योजनेंतर्गत संचालक, नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, पुणे यांचेकडून प्राप्त नगरपरिषद / नगरपंचायत माहूर, नरखेड, मोवाड, काटोल, हिंगोली, सेनगाव, घाटंजी, लोणावळा, , किनवट, उदगीर, गंगाखेड, महाबळेश्वर, गंगापूर, गोंदिया व बाळापूर यांच्या विकास योजना आराखड्यातील कामांना दिलेल्या तांत्रिक मान्यतेस अनुसरुन प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्याअंतर्गत केंद्र शासनाच्या “भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना २०२५-२६” या प्रस्तावित योजनेंतर्गत माहूर नगरपंचायतसह राज्यातील १५ नगरपरिषद / नगरपंचायत विकास योजना आराखड्यातील रु.३,८१,३१,००,१८१/- च्या कामांना संबंधित विभागाने दिलेल्या तांत्रिक मान्यतेस अनुसरुन या शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेतून माहूर नगरपंचायत अंतर्गत मंजूर विकास आराखड्यानुसार आरक्षण क्र. १९ शहरात व्यापारी संकुल व वाहनतळ विकसित करणे या कामासाठी
१९,६६,३१००० कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
माहूर येथे आरक्षण क्र. १९ याठिकाणी व्यापारी संकुल व वाहनतळ विकसित करण्याचे काम होणार असल्याने एकाच ठिकाणी अनेक दुकाने (व्यापारी संकुल) आणि गाड्यांसाठी पार्किंगची (वाहनतळ) सोय असलेली मोठी व्यावसायिक जागा तयार करण्यात येणार आहे. जिथे आधुनिक सुविधा असतील; ज्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी आणि वाहनांच्या पार्किंगसाठी सोयीस्कर ठिकाण मिळणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होणार आहे, असे हे एकात्मिक नियोजन असणार आहे.
एका मोठ्या इमारतीत किंवा परिसरात होऊ घातलेल्या या व्यापारी संकुलात अनेक व्यावसायिक दुकाने, मॉल्स, कार्यालये इत्यादींचा समावेश असणार आहे.येथे ग्राहकांना विविध वस्तू आणि सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तर वाहनतळावर वाहने (गाड्या, दुचाकी) पार्क करण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध असणार आहे. ज्याचा उपयोग व्यापारी संकुलात येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांच्या सोयीसाठी होणार आहे. विशेष म्हणजे माहूर शहरात विकसित करण्यात येणाऱ्या व्यापारी संकुल व वाहनतळामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व सोयी मिळणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे कारण वाहने एकाच ठिकाणी पार्क करता येणार आहे. यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार असून व्यावसायिक वातावरण सुधारणार आहे.एकाच जागेत व्यापार आणि पार्किंगची सोय असल्याने पायाभूत सुविधांचा योग्य वापर होणार आहे.
म्हणजेच आता लवकरच माहूर शहरात व्यापारी संकुल व वाहनतळ विकसित करण्याचे काम सुरू करुन ग्राहकांना खरेदीचा आणि वाहनांच्या पार्किंगचा चांगला अनुभव देण्यासाठी एक सुनियोजित व्यावसायिक जागा तयार करण्यात येणार आहे.
शासनाच्या या विकासात्मक निर्णयाबद्दल आमदार भीमराव केराम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह नगरविकास मंत्री यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे,तर भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामुने यांनी आमदार भीमराव केराम यांचे शहरवासियांच्यावतीने आभार मानले असून, व्यावसायिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.


















