75वर्षीय रमेश बैस हे सध्या झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापुढे झारखंडऐवजी ते आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहतील.
रमेश बैस यांची झारखंडच्या राज्यपालपदावर नियुक्ती 2021 मध्ये झाली होती. दोनच वर्षांत त्यांना झारखंडमधून महाराष्ट्रात पाठवण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदाची जवळपास साडेतीन वर्षांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली होती.
अखेर, त्यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आणि त्यांच्या ऐवजी नवा चेहरा म्हणून रमेश बैस महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.
अशा स्थितीत रमेश बैस यांच्या कारकीर्दीवर सर्वांचं लक्ष असेल, हे निश्चित. या पार्श्वभूमीवर रमेश बैस यांचा आजवरचा राजकीय प्रवास कसा राहिला, हे पाहणंही या निमित्ताने महत्त्वाचं आहे.
बैस यांचा जन्म 02 ऑगस्ट 1947 रोजी रायपूरमध्ये (पूर्वीचा मध्य प्रदेश आणि आताचे छत्तीसगढ) झाला. त्यांचं शालेय शिक्षण भोपाळमध्ये झालं.
पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश केला 1978 मध्ये ते रायपूरच्या नगरपालिकेत निवडून आले. 1980 मध्ये झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी बैस यांनी काँग्रेसच्या सत्यनारायण शर्मा यांचा पराभव करत बाजी मारली.
वाजपेयी सरकारमधील मंत्री
1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते पर्यावरण आणि वनखात्याचे मंत्री होते.
तसंच नंतर याच सरकारमध्ये पोलाद, खाणी, खते, माहिती आणि प्रसारण खात्याचीही धुरा सांभाळली.
2014 सालीही त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. पण नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही.
2019 पासून राज्यपालपदावर
2019 च्या लोकसभा निवडणुकीत रमेश बैस यांना पुन्हा तिकिट देण्यात आलं नाही. मात्र त्यांची नियुक्ती त्रिपुराच्या राज्यपालपदावर करण्यात आली.
रमेश बैस झारखंडचे 2021 पासून राज्यपाल आहेत. 2019 ते 2021 या कालावधीत ते त्रिपुराचे राज्यपाल होते.