सोलापूर, 6 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे जिल्हाच्या पश्चिम घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने पुणे सोलापूर नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण शंभर टक्के शंभर टक्के भरले आहे. सकाळी उजनी धरणात दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग एक लाख ८० हजार क्युसेकपर्यंत वाढला. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सकाळी तब्बल १ लाख क्युसेक पाणी प्रवाह वाढवण्यात आला.
दुसरीकडे नीरा नदीतूनही मोठ्या प्रमाणात सोडलेले पाणी भीमा नदीत नृसिंहपूरजवळ येत आहे. त्यामुळे भीमा नदीला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
धरणात एकूण पाणीसाठा ११७ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा ५३ टीएमसी म्हणजे टक्केवारी ९९ टक्के एवढी झाली आहे. पुण्यातील खडकवासला, बंडगार्डनमार्गे दौंडमार्गे पाण्याचा विसर्ग दीड लाख क्युसेकच्या पुढे सरकल्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण करण्याचा भाग म्हणून धरणातून भीमेच्या पात्रासह धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यात तसेच भीमा-सीना जोडकालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे.