लातूर / औसा – राज्य सरकारने निवडणुकीत जाहीर केलेली शेतकऱ्यांची तीन लाख रुपयांची कर्जमाफी जो पर्यंत केली जात नाही . तोपर्यंत महायुतीच्या उमेदवारास मतदान नाही. कर्जमाफीनंतरच मतदान. अशी भुमिका शेतकऱ्यांनी घ्यावी.असे आवाहन शिवसेने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.
औसा तालुक्यातील भुसणी येथील शेतकऱ्यांशी गुरुवार दि. ६ रोजी संवाद साधताना शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे बोलत होते. खा. ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, माजी आ. दिनकर माने, आ. मिलींद नार्वेकर, आ. कैलास पाटील, डाँ. शोभा बेंजरगे, जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी आदी उपस्थित होते.
उध्दव ठाकरे म्हणाले, राज्य सरकार जोपर्यंत कर्जमाफी करीत नाही. तोपर्यंत महायुतीच्या उमेदवारास मतदान नाही. अशी भूमिका आता शेतकऱ्यांनी घ्यावी. मी तुम्हा सर्वांच्या पाठीशी असून तुम्हा सर्वांना हिम्मत द्यायला आलो आहे, असा विश्वास माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव – ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना दिला.
ठाकरे पुढे म्हणाले, शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रूपये दिल्याशिवाय आम्ही या सरकारला सोडणार नाही. आपण सर्व शेतकऱ्यांनी एकीचे बळ दाखविले पाहिजे. आपल्या घरातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न जिवंत असताना राज्याचे मुख्यमंत्री बिहारमधील निवडणूक प्रचारासाठी जातात. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी सणसणीत टिका उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यावेळी केली.व लाडक्या बहिणीने आता सरकारकडे २१०० रूपये द्या. असा तगादा लावला पाहिजे, असा सल्ला भगिणींना दिला.
संकटाच्या वेळी आम्ही शेतकरी, जनता यांच्यासोबत आहोतच. तुम्हीही आमच्यासोबत असले पाहिजे. असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केले. यावेळी काही महिला शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी औसा, निलंगा तालुक्यातील शेतकरी ,कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.

















