मुंबई – किरीट सोमय्या यांची राष्ट्राप्रती निष्ठा वाखाणण्याजोगी असून बाळासाहेब ठाकरे यांनी वाचा फोडलेल्या बांगलादेशी-रोहिंग्यांच्या मुद्द्याला खऱ्याअर्थाने मार्गी लावण्याचे मोलाचे काम केले.असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी केले.
माजी खा. सोमय्या यांच्या ‘बांगलादेशी घुसखोर जन्म प्रमाणपत्र घोटाळा’ या पुस्तिकेचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मधु चव्हाण, राज पुरोहित, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह उपस्थित होते.
यावेळी चव्हाण म्हणाले की, मशिदी वरचे अनधिकृत भोंगे हटविण्यासाठीचा लढा यशस्वी केल्यानंतर सोमय्या यांनी बांगलादेशी, रोहिग्यांचा जन्म प्रमाणपत्र घोटाळा शोधून काढला. राज्यात सव्वा दोन लाख बांगलादेशी आणि रोहिग्यांनी अवैध मार्गांनी जन्म प्रमाणपत्र मिळवले असल्याची धक्कादायक बाब त्यांनी पुराव्यानीशी प्रशासन आणि पोलिसांच्या निदर्शनास आणले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे 25 शहरात 31 गुन्हे दाखल झाले आणि तब्बल 5 हजार आरोपीना अटक झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत करत असलेल्या कामाचे जनआंदोलन होण्याची गरज असून सर्व भारतीय तसेच सर्व राजकीय पक्षांनी या कामी त्यांची साथ द्यायला हवी असे आवाहन चव्हाण यांनी केले.
यावेळी सोमय्या म्हणाले की, बोगस जन्म दाखल्याबाबत 30 डिसेंबर 2024 रोजी पहिली तक्रार दाखल केली. 12 महिन्यांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने 2 लाख 24 हजार बोगस प्रमाणपत्र रद्द करण्यात आम्हाला यश आले आहे. यामध्ये 25 ते 65 वयोगटातील 97 टक्के बांगलादेशींचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. 5 हजार जणांना अटक झाली त्यातील काही जामीनावर सुटले आहेत. मुंबई मध्ये 1 हजार बोगस जन्म प्रमाणपत्र आढळून आली असून महापालिका आरोग्य विभागातील 3 अधिका-यांना अशी बोगस प्रमाणपत्र तयार करून दिल्याप्रकरणी निलंबित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाची स्पर्धा कोणाशीच नाही. किंबहुना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची गोल टोपी घालायची स्पर्धा सुरू आहे असा टोला त्यांनी लगावला.


















