सोलापूर – बार्शी शहरातील तणावाच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन हिंदू-मुस्लीम समाजातील प्रतिनिधींशी संवाद साधून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे निर्देश दिले.
दि. 22 फेब्रुवारी रोजी बार्शी शहरात एकमिनार मस्जीद जवळ बारंगुळे प्लॉट येथे शिवजयंती निमित्त चालू असलेल्या कार्यक्रमाचे ठिकाणी फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन समाजात वाद निर्माण झाला होता. बार्शी शहर पोलीस ठाणेस माहीती मिळाल्याने तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले व दोन्ही समाजातील लोकांना शांत करुन आपसात गुन्हे दाखल केले. हिंदू-मुस्लीम समाजामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दि. 23 फेब्रवारी 2026 रोजी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली. पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांनी स्वतः बार्शी शहरात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दोन्ही समाजातील मान्यवर, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक यांच्यासोबत शांतता समितीची बैठक आयोजित केली.

दोन्ही समाजातील प्रतिनिधींना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सर्वांना संयम राखण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच सोशल मिडीयावर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले. कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील भागांमध्ये फिक्स पॉईंट व गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी कोणतीही अफवा अथवा संशयास्पद बाब त्वरित पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले.
शांतता समितीच्या बैठकीत दोन्ही समाजातील प्रतिनिधींनी एकोप्याने व शांततेने वातावरण राखण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रशासन व पोलीस विभागाच्या समन्वयातून शहरात शांतता प्रस्थापित राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर साहेब तसेच संजय जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण तसेच बार्शी शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक, बालाजी कुकडे हे उपस्थित होते.























