गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. राज्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगावमध्ये भर पावसाच एका नारळाच्या झाडावर वीज पडली आणि झाड पेटलं. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ही घटना घडली त्यावेळी झाडाखाली किंवा परिसरात व्यक्ती नसल्यानं अनर्थ टळला आहे. अवकाळी पावसाच्या काळात वीज पडून दुर्घटना होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी झाडाखाली थांबू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
धरणगाव शहरासह ग्रामीण भागात रविवारी अवकाळी पावसाने मेघगर्जनेसह किरकोळ हजेरी लावली. यावेळी गारखेडा रोडवरील एका शेतात वीज कोसळून नारळाचे झाड पेटले. यावेळी त्या ठिकाणी कोणताही व्यक्ती नसल्याने अनर्थ टळला आहे.
मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस, भरपावसात वीज कोसळली अन् नारळाचं झाड पेटू लागलं, व्हिडिओ व्हायरल #Jalgaon #Rain #Dharangaon #Video pic.twitter.com/pP60NUjcwO
— Maharashtra Times (@mataonline) March 5, 2023
धरणगाव येथील राजेंद्र पाटील यांचे सोनवद रोडवरील मोठ्या पाटचारीजवळ शेत आहे. या शेतात काही नारळाची झाडे आहेत. यातील एका झाडावर किरकोळ पाऊस सुरु असताना रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास वीज पडली. त्यामुळे झाडाने भर पावसात पेट घेतला. तर आजू-बाजूच्या झाडांचे देखील नुकसान झाले आहे. घटना घडली त्यावेळी सुदैवाने जवळपास कोणी नसल्यामुळे अनर्थ टळला.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हामुळे उन्हाचे चटके बसत होते. वातावरणाचा पारा वाढवून अचानक उकड्याचा त्रास वाढला होता. मात्र, आज अचानक वातावरणात बदल झाला सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. यात जळगाव जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये पावसाने सुद्धा हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील दोन ते तीन दिवस अशाच पद्धतीचे वातावरण राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेला गहू , हरभरा तसेच इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदा उन्हाची तीव्रता अधिक जाणवणार असून उन्हाळ्याचा फळबागांना फटका बसू शकतो.त्यामुळं शेतकऱ्यांनी तापमानवाढीच्या काळात शेतीमध्ये पाण्याचं प्रमाण अधिक ठेवावं, असं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे.